मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक निवेदने, तक्रारी, गाऱ्हाणी घेवून येत असतात. अशा नागरिकांच्या समस्या समजावून घेवून मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्यकता होती. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
जिल्हास्तरावर व विभागस्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरिता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आले आहे. त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या सर्व कार्यालयांच्या समन्वयाचे काम देखील प्रशासकीय अनुभव असणारे रवींद्र वायकर पाहणार आहेत. वायकर यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य कक्षातील अधिकारी- कर्मचारी देण्यात येत आहेत.