मुंबई: हिंगणघाट येथील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. पीडितेच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राज्य सरकारने तातडीने लक्ष देत अश्या प्रकारच्या आरोपींवर कठोर शिक्षा होईल, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो. ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे आहे”
दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली, हिंगणघाटमधील पीडितेचा आज दुर्दैवी अंत झाल्याची बातमी ऐकून मन अतिशय उदास झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांची ही स्थिती पाहून मन अतिशय अस्वस्थ होतंय. मुख्यमंत्री उद्धवजींनी गृहखात्यामध्ये लक्ष घालून, महिलांवरील वाढत्या आत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण आणावं,अशी मागणी त्यांनी केली.