इस्लामाबाद – काश्मीरप्रश्नावर पुन्हा एकदा पाकिस्तानने नापाक मनसुबे रचले आहेत. नवीन वर्षात टोकियोमध्ये ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. घोडेस्वारी प्रकारामध्ये पात्र ठरलेल्या पाकिस्तानच्या घोडेस्वार उस्मान खानने आपल्या घोड्याचे नाव ‘आझाद काश्मीर’ ठेवले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने उस्मानच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे.
नवीन वर्षात टोकियोमध्ये होणाऱ्या घोडेस्वारी प्रकारात भारताच्या फवाद मिर्झा आणि पाकिस्तानच्या उस्मान खानने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने आले आहेत. या खेळांना नेहमीच युद्धाचे स्वरूप दिले जाते. असेच उस्मान खाननेही केले आहे. ऑस्ट्रेलियावरुन खरेदी केलेल्या घोड्याचे नाव बदलून आझाद काश्मीर असे नाव दिले. हाच घोडा उस्मान ऑलिम्पिकमध्ये उतरविणार आहे. यावर भारतीय ऑलिम्पिक संघटना पाक घोडेस्वाराविरोधात कायदेशीर तक्रार करण्याच्या तयारीत आहे.
काय आहे ऑलिम्पिक नियमावली?
ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारची राजकीय, धार्मिक कृत्य करण्याला मनाई आहे. भारत-पाकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या काश्मीर वादाच्या पार्श्वभूमीवर पाक घोडेस्वाराने आपल्या घोड्याला आझाद काश्मीर नाव दिल्यामुळे नियमांचा भंग झाल्याची तक्रार भारतीय ऑलिम्पिक संघटना करणार आहे.