मुंबई – राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेकडून 9 फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी मनसेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. मात्र मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
मोर्चाची जोरदार तयारी!
मनसेच्या 9 फेब्रुवारी रोजी निघणाऱ्या मोर्चाची कल्याण डोंबिवलीत जोरदार तयारी सुरू आहे. मनसे आमदार राजू पाटील हे या मोर्चाच्या तयारीचा स्वतः आढावा घेत आहेत. कल्याण डोंबिवली हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो. याच भागातून मनसेचे आमदार राजू पाटील हेदेखील निवडून आले आहेत. त्यामुळे 9 तारखेचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी राजू पाटील हेदेखील स्वतः तयारीचा आढावा घेताना दिसत आहेत.
“चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल,’ अशा नोटीसा पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम 143,144 आणि 149 नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत. पोलिसांच्या या भूमिकेनंतर मनसे नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
“रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही. मात्र आम्ही एक मोर्चा काढल्याने लगेच कसा प्रश्न तयार होतो?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे मनसेच्या या महामोर्चाआधी वातावरण चांगलेच ढवळून निघत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीला काही कार्यकर्त्यांची धरपकडही होण्याची शक्यता आहे.