मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून मरिनड्राईव्ह, सीएसएमटी, दादर, कुर्ला, बोरीवली आदी भागातील बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली आहे.
एवढेच नव्हे तर शहरात 5408 सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना 18 लाखाचे ई-चलन पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली.
वाहतूक विभागातील भ्रष्टाचार प्रकारणी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने मुंबईतील ट्राफिकच्या समस्येवर वेळोवेळी ट्राफिक पोलीस विभागाला चांगलंच फैलावर घेत होते.
त्यावर वाहतुक पोलीस विभागाच्या वतीने गेल्या 2 वर्षांत वाहतुक विभागात करण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी केलेल्या उपयायोजनांचा लेखाजोगा करणारे प्रतिज्ञापत्रच सादर करण्यात आले. हायकोर्टाने याची दखल घेत चार वर्षानंतर याचिका निकाली काढली.