15 हजार भाजप समर्थकांशी संपर्क साधण्याची नवीन रणनीती
नवी दिल्ली – कडाक्याच्या थंडीत दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या मतदानाची तारीख जशी-जशी जवळ येत आहे, तसे सर्वच पक्ष राजकीय बाण सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह सर्व बड्या नेत्यांना दिल्लीत आणले आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीने भाजपला रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपने त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांना दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांवरील भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांचा डेटा देण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5 हजार आप कार्यकर्ते आणि समर्थकांना 15 हजार भाजप समर्थकांशी संपर्क साधण्याची आणि निवडणुकीच्या दिवशी त्यांना बूथवर आणून आपच्या बाजूने मतदान करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणजेच “आप’ने आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा समर्थकांना तीन भाजप समर्थकांपर्यंत “आप’च्या बाजूने आणण्यासाठी नवीन रणनीती आखली आहे.
या रणनीतीवर “आप’ने सोमवारीपासूनच काम सुरू केले आहे. शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान होणार असून गुरुवार, 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार, 11 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.