मुंबई – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी मुंबईतील झोपडीवासियांना प्रत्येकी पाचशे चौरस फुटांची घरे देण्याचे आश्वासन दिले होते पण त्या आश्वासनाची राज्य सरकारकडून पुर्तता झालेली नाही अशी तक्रार माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून केली आहे. कॉंग्रेसने दिलेल्या निवडणूक आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी राज्य सरकार मध्ये एक स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची सुचना सोनया गांधी यांनी राज्य सरकारला करावी अशी मागणीही यात करण्यात आली आहे.
हे पत्र देवरा यांनी 24 जानेवारीला पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की मुंबईतील झोपडीवासियांना पाचशे चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले पाहिजे अशी सुचना आपण स्वताच राहुल गांधी यांना केली होती. त्यानुसार राहुल गांधी यांनी आपल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये हे आश्वासन मतदारांना दिले होते. तीन पक्षांच्या किमान समान कार्यक्रमातही या आश्वासनाचा उल्लेख आहे. पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही.
आजही झोपडपट्टी पुर्नवसन कार्यक्रमात झोपडीवासियांना केवळ 269 चौरस फुटांचेच घर दिले जात आहे असेही त्यांनी या पत्रात सोनिया गांधी यांच्या निदर्शनाला आणले आहे. आपण मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना राहुल गांधी यांची ती प्रचार सभा झाली होती. पण त्या आश्वासनांची अजून पुर्तता होत नाही हे आपल्यासाठी चिंताजनक आहे असेही मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. तथापी गेल्या 50 दिवसांच्या कारभारात राज्यातील सरकारने आपल्या अन्य निवडणूक आश्वासनांवर काम करणे सुरू केले आहे ही समाधानाची बाब आहे असेही देवरा यांनी यात नमूद केले आहे.