बहुजन समाज पक्षाचे मोदी सरकारला आवाहन
लखनौ – पाकिस्तानी वंशाच्या अदनान सामी यांना भारताचे नागरिकत्व देऊन त्यांना पद्म पुरस्कार दिला जातो तर अन्यही अत्याचार ग्रस्त पाकिस्तानी नागरीकांना भारताचे नागरिकत्व का मिळू शकत नाही असा सवाल उपस्थित करीत मुस्लिमांचाही सीएए मध्ये समावेश करावा अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मोदी सरकारकडे केली आहे.
या संबंधात आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, अदनान सामी हे अत्याचारीत पाकिस्तानी नागरीक आहेत. त्यांचा जर विचार होऊन त्यांना भारतीय नागरीकत्व दिले जात असेल तर अन्य मुस्लिमांना सीएए मधून का वगळले गेले आहे याचाही विचार केला पाहिजे. या मुद्दा लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीएएच्या संबंधात फेर विचार करावा असे आवाहनही मायावती यांनी केले आहे. अदनान सामी हे गायक असून त्यांचा जन्म लंडन येथे झाला असला तरी ते मुळचे पाकिस्तानी आहेत. त्यांचे वडिल पाकिस्तानच्या हवाईदलातील अधिकारी होते. सामी यांनी सन 2015 मध्ये भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज केला होता त्यानुसार त्यांना जानेवारी 2016 मध्ये भारताचे नागरिकत्व दिले गेले आहे.