भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीज यांची टीका
मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करत अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत मात्र तेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकमेकांचे एकमेकांवर वजन आहे असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.
महाविकास आघाडीने जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फसवी आहे अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचविरोधात भाजपाने कोल्हापुरात मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावरही भाष्य केले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला कुणी अडवलं आहे? आम्ही स्वच्छ आहोत. जी काही चौकशी करायची आहे ती लवकर करा. या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे त्यामुळे त्यांचे तेच पडतील असाही टोला पाटील यांनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवारच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते स्वतःच सगळ्या घोषणा करतात. अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणात केंद्राच्या समितीला सहकार्य केलं नाही तर त्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.