भाजप सोडणार असल्याची अफवा असल्याची स्पष्टोक्ती
औरंगाबाद : मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करावा या मागण्यांसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर या उपोषणाला उपस्थित हेते. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी संध्याकाली 4.30 वाजण्यादरम्यान हे उपोषण मागे घेतले.
उपोषणाची सांगता करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी भाजप सोडणार या निव्वळ अफवा आहेत. त्याकडे कोणीच लक्ष देऊ नका. तसेच, यावेळी त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल भाजपच्या नेत्यांची आभारही मानले. कार्यकर्ते सध्या चांगले वागत आहेत, विरोधात असताना तुम्ही चांगले वागता का? त्यामुळे विरोधातच बसावे का? असा मिश्किल प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला. नव्या सरकारकडून चांगल्या अपेक्षा आहेत.
मी 100 दिवसांत काही त्यांच्यावर टीका करणार नाही, असेही पंकजा म्हणाल्या. मी मराठवाड्यात समाजसेविका म्हणून काम करणार. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ठाकरे सरकारने इथला पाणी प्रश्न सोडवला पाहिजे. तसेच आमच्यापेक्षा चांगले काम करुन दाखवा असेही आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
दरम्यान उपोषण सत्तेच्या विरोधात नसून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष जावे म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे म्हणाल्या. उपोषणस्थळी मराठवाडा पाण्यापासून कसा वंचित राहिला आहे, याचे चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते. वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प अपूर्ण राहिल्याचही इथे नमूद करण्यात आले आहे.