लखनऊ : देशाला धार्मिक स्तरावर विभाजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशाचे संविधान धोक्यात आले आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले.
300 किमीची गांधी शांती यात्रा घेऊन ते येथे आले त्यावेळी ते पत्रकारांशी अनौपचारिक बोलत होते. सिन्हा म्हणाले, शांती आणि अहिंसेचा प्रचार करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. देशाचे संविधान आणि लोकशाहीला धोका असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे बाहेर पडण्यावाचून पर्याय राहिला नाही. देशात विलक्षण अस्वस्थता आहे. शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे सर्वत्र निदर्शने सुरू आहेत.
समाजात प्रत्येकाला एकमेकाविषयी द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. हे थांबवणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. जर नागरिक काही घटनांमुळे अस्वस्थ असतील तर सरकारने त्यांचे ऐकले पाहिजे, असे ते म्हणाले.
गांधी शांती यात्रेची सुरवात मुंबईत नऊ जानेवारी रोजी झाली होती. तर त्याची सांगता दिल्लीत राजघाटावर 30 जानेवारी रोजी होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, शत्रुघ्न सिन्हा आणि अखिलेश यादव या नेत्यांनी या यात्रेला सक्रीय पाठींबा दिला आहे.