पुणे – गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजनेची अंमलबजावणी राज्यात दि.26 जानेवारीपासून सुरू होत आहे.
योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 6 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, लाभार्थींचे फोटो काढून महाअन्नपूर्णा हा मोबाइल ऍपमध्ये अपलोड केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची संख्या निश्चित करून अनुदान संबधित केंद्रचालकांना दर पंधरा दिवसांनी दिले जाणार आहे.
योजनेमध्ये थाळीची किंमत शहरी भागात प्रती थाळी 50 रुपये असणार असून नागरिकांना याठिकाणी 10 रुपयांत जेवण मिळणार आहे. उर्वरित 40 रुपयांचे अनुदान केंद्रचालकांना मिळणार आहे.