ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; ग्रामस्थांमधून नाराजी
कराड (प्रतिनिधी) – कळंत्रेवाडी, ता. कराड येथील म्हसोबा-लक्ष्मी या ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर असलेल्या जलकुंभाची दुरवस्था झाली असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजीचे सूर निघत आहेत.
कळंत्रेवाडीचे पोलीस पाटलांनी ग्रामदैवतांकडे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची तसेच गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून एप्रिल 2019 मध्ये स्वखर्चाने जलकुंभ बसवून दिला आहे. मात्र या जलकुंभाच्या देखभालीकडे ग्रामपंचायतीकडून हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.
वास्तविक पिण्याचे पाणी हे नेहमी उंचावर ठेवायचे असते. हा साधा सरळ व्यवहारिक नियम ग्रामपंचायतीने जलकुंभ बसवताना पाळलेला नाही. सदरचा जलकुंभ साधारण चार ते पाच फुटाचा कट्टा बांधून त्यावर ठेवून त्याला नळाच्या तोट्या बसवणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीने यामध्ये निष्काळजीपणा दाखवत तो सदरचा जलकुंभ जमिनीवर बसवला आहे. तो बसविल्यापासून त्याकडे पुन्हा ढुंकूनही पाहिलेले नसल्याने त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्याचे झाकण सतत उघडेच असते. तर आतमधील पाण्याला शेवाळे लागल्याने या पाण्याचा उग्र वास येत आहे.
पोलीस पाटलांनी ज्या उदात्त हेतूने हा जलकुंभ दिला. तो हेतू साध्यच झाला नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या सर्व बाबींचा ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करुन जलकुंभ सुस्थितीत बसवून त्याची होणारी दुरवस्था थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरीत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचू तेवढा कमीच आहे. भेट दिलेल्या जलकुंभाची दुरवस्था झाल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत. ज्या हेतूने जलकुंभ भेट म्हणून देण्यात आला, त्या हेतूलाच ग्रामपंचायत प्रशासनाने हरताळ फासला आहे.
– जयसिंगराव येळवे, पोलीस पाटील