चाफळ (वार्ताहर) – कोचरेवाडीचा रस्ता खचल्याचे सचित्र वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध करताच त्याची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या ठिकाणी भराव टाकत रस्त्याची डागडुजी केल्यामुळे कोचरेवाडी व परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोचरेवाडी गाव डोंगराच्या मध्यावर वसलेले असून येथील शेतकरी शेतीपूरक असा दुग्धव्यवसाय करतात. प्रत्येक कुटुंबाचे अर्थशास्त्र हे शेतीपूरक दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. या गावाला जाणारा हा एकमेव घाटरस्ता असून अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून त्याचे दोन भाग झाले होते. त्यामुळे या गावातील वाहतूक बंद झाल्याने डेअरी वाहतूकही ठप्प झाली होती. यामुळे गावातील दुधाचे संकलन बंद झाल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
खोनोली ते कोचरेवाडी दरम्यान असणाऱ्या नाळवा नावाच्या शिवारातील रस्त्यावर साधारणपणे तीस ते पस्तीस फूट लांब आणि एक फूट खोल चर पडून डांबरीकरण पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील वाट बिकट बनली होती. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत होते. या घाटामध्ये एका धोकादायक वळणावर डोंगरातून येणारे गाळमिश्रीत पाणी सरळ डांबरी रस्त्यावर आल्याने तेथील डांबरीकरण उद्ध्वस्त झाले होते. तसेच या घाट रस्त्यावर कसलेच सूचना अगर दिशादर्शक फलक नसल्यामुळे हा मार्ग अपघाताला निमंत्रणच देत होता. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच बांधकाम विभागाने खचलेल्या रस्त्याची डागडुजी केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.