सात वर्षांपासून घरासाठी भटकंती
पिंपरी – जेएनएनयूआरएम-बीएसयूपी योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चिखलीतील पेठ क्रमांक 17 व 19 येथे उभारलेल्या महापालिकेच्या स्वस्त घरकुल योजनेत आत्तापर्यंत 5 हजार 299 कुटुंबीयांनाच घरे मिळाली आहेत. गेल्या सात वर्षांपासून तब्बल 1 हजार 137 जणांना अद्यापही घर न मिळाल्याने त्यांची प्रतीक्षा कायम आहे. तर आम्हाला घर कधी मिळणार यासाठी या नागरिकांचे पालिका प्रशासनाकडे आर्जव सुरू आहे.
चिखली येथे 25.30 हेक्टर क्षेत्रात ही योजना साकारली आहे. योजनेमध्ये 5 हेक्टर जागेत विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये शाळा, सांस्कृतिक भवन, दवाखाना, भाजी मंडई आदींचा समावेश आहे. प्रकल्पामध्ये 158 इमारतीत एकूण 6 हजार 636 सदनिका उभारल्या जात आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 136 इमारतीतील 5 हजार 712 घरे बांधून तयार झाली आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 5 हजार 299 कुटूंबियांनाच प्रत्यक्ष घरांचा ताबा देण्यात आला. घरे तयार असूनही 413 कुटुंबीयांना अद्याप घरांचा देण्यात आलेला नाही. तर उर्वरित 924 घरांचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. अपूर्ण बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
स्वस्त घरकुल प्रकल्पात सध्या गढुळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शाळा, ओपन जीम, खेळाचे मैदान, भाजी मंडई आदी सुविधा व्हायला हव्यात. प्रकल्प परिसरात चोरीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांच्या वतीने रात्र गस्त घातली जात आहे. पोलिसांकडून रात्र गस्त होणे आवश्यक आहे. त्याशिवाय, प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या घरांचे नागरिकांना तातडीने वाटप व्हायला हवे.
– तुषार सोनवणे, संस्थापक-अध्यक्ष, घरकुल समस्या निवारण समिती.
स्वस्त घरकुल प्रकल्पात सद्य:स्थितीत 22 इमारतीमधील 924 सदनिकांचे बांधकाम सुरू आहे. त्यातील 4 इमारतींसाठी बांधकाम पूर्णत्व दाखला घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला आहे. हा दाखला मिळाल्यानंतर घरांचे वाटप करण्यात येईल.
– चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त, महापालिका