अवकाळी व अतिवृष्टीतही तरुण शेतकऱ्यांनी घेतले उत्पादन
नीरा – पुरंदर तालुक्यातील राख, गुळूंचे आणि कर्नलवाडी या परिसरात डाळिंबाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्य व देशभरात डाळिंबाला मोठी मागणी आहे. त्या बरोबरच परदेशातही मागणी वाढत आहे. परदेशात विषमुक्त असणाऱ्या डाळिंबांना मोठी मागणी असते. त्यामुळे परदेशातील बाजारपेठेच्या मानांकनानुसार उत्पादन व्हावे म्हणून येथील शेतकरी नेहमीच प्रयत्नशील असतो.
कर्नलवाडी येथील पृथ्वीराज निगडे यांच्या डाळिंबाचे उत्पादन सलग पाचव्या वर्षी युरोपीय बाजारासाठीचे मानांकन प्राप्त करण्यात यशस्वी ठरल्याने या वर्षीसुद्धा पुरंदरचे डाळींब युरोपच्या बाजारात पोहोचले आहे. पुरंदर हा दुष्काळप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो.
सतत पडणारा दुष्काळ आणि पाण्याची कमतरता अशी या तालुक्याची ओळख आहे. मात्र येथील शेतकऱ्यांनी दुष्काळ व पाण्याच्या कमतरतेवर नेहमीच मात केली आहे. कमी पाण्यावर येणारी फळपिके घेऊन येथील शेतकऱ्यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढवले आहे.स्थानिक बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली फळे कशी विकली जातील याकडे सद्या तरुण पिढीने आपले लक्ष केंद्रित केले आहे.
त्यामुळेच येथील पृथ्वीराज निगडे व विराज निगडे या बंधूंनी अत्यंत उत्तम प्रतीच्या उत्पादित केलेल्या डाळिंबांना यूरोपच्या बाजारातील मानांकन प्राप्त झाले आहे. त्यातही इंग्लंड आणि फिनलॅंड यांसारख्या देशांमधून या डाळिंबांना चांगली मागणी आहे. नेहमीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी ही गावे अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून आहेत. मात्र येथील शेतकऱ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर येथे नंदनवन फुलवले आहे.
कृषी विभाग व अनुभवी शेतकऱ्यांकडुन योग्य मार्गदर्शन भेटल्याने त्यांनी डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेतले. युरोपच्या बाजारात आवश्यक असलेले मानांकने पूर्ण करणारे डाळिंबाचे पीक घेत आहेत. यावर्षी सुद्धा त्यांनी घेतलेल्या डाळिंबाला युरोपच्या बाजारात प्रवेश मिळाला असून इंग्लंड आणि फिनलंड या देशात हे उत्पादन पाठवण्यात आले आहे. शेती करत असताना अनेक वेळा शेतीतून उत्पादन मिळत नाही, शेती परवडत नाही असे म्हटले जाते.
मात्र लक्ष देऊन व परिश्रमपूर्वक शेती केल्यास शेती फायदेशीर ठरते. आम्ही डाळिंबाच्या शेतीला सुरुवात केल्यापासून आमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे वर्षभर आम्ही शेतीवर लक्ष देत असतो. पिकावर येणारे रोग, पाणी याबाबत पुरेपूर काळजी घ्यावी लागते.औषधांचा अत्यंत कमी वापर करून डाळिंबाचे उत्पादन घेता येते. त्यामुळेच भारतीय डाळिंबाला युरोपसह इतर देशातून मागणी वाढत आहे.
अखेरच्या काळात निसर्गाने दिली साथ-
यंदा पाऊस जास्त झाल्याने डाळिंबाचे पीक घेणे अत्यंत कठीण गेले. भर पावसात औषध फवारणी करणे. झाडे जगविण्यासाठी कसरत करावी लागली. सतत पडणारा पाऊस या पिकासाठी पोषक नव्हता, त्यामुळे यावर्षी बाजार तोट्यात जातो की काय? अशी शंका निर्माण झाली होती.
मात्र नियोजनबद्ध केलेल्या औषध फवारणी व अखेरच्या काळात निसर्गाने दिलेली साथ. यामुळे आमचे उत्पादन युरोपच्या मानांकनासाठी योग्य ठरल्याने आम्हाला मोठा आनंद झाला. यातून आम्हाला चांगले उत्पन्न मिळणार आहे, असे शेतकरी विराज निगडे यांनी यावेळी सांगितले.
भारतात उत्पादित होणाऱ्या डाळिंबांना इतर देशांमधून चांगली मागणी आहे. डाळिंबाची प्रत, गुणवत्ता इतर देशातील डाळिब पिकापेक्षा चांगली आहे. चीनचे डाळिंब आपल्या डाळिंबा पेक्षा मोठे असते. मात्र ते चवीला भारतीय डाळिंबा इतके चांगले नसते. त्यामुळे येथील डाळिंबाला चांगला उठाव राहतो. जागतिक बाजारातील मागणी पाहता येथील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल.
-जीवन ज्योतसिंग, व्यापारी थायलंड.