पुणे/पिंपरी – “आपण पुणेकर आहोत, मुंबईचं जीवन वेगळं असून, मुंबई 24 तास जागी असते. त्यातून काय अनुभव येतो, ते पहिल्यांदा पाहुयात. पुणेकरांना मान्य होईल, असा निर्णय घेऊ. मुंबईचं लाइफ वेगळं आहे. मुंबई कधी झोपत नाही, असं नेहमी बोललं जातं. मुंबईच्या काही ठराविक भागाबाबत नाइट लाइफबाबत निर्णय घेतला आहे. जर काही चांगले निष्पन्न झाले, तर पुढचा विचार करू. लगेच इकडं सुरू झालं की, इकडे सुरू करा, असं नसतं.’ अशा खास शैलीत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी भाष्य केले आहे.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आरंभ रविवारी (दि. 19) अजित पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. पाच वर्षांखालील बालकांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पोलिओचा डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्यसेवा विभागाचे उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी सामूहिक असून, निरोगी पिढी घडविण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. ही मोहीम आपल्या सर्वांची असून, ती राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, “देशात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सुरू आहे. पुणे जिल्ह्यात 1999 पासून पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, जिल्ह्यात एकूण 11 लाख 11 हजार 334 बालके या लसीकरणासाठी अपेक्षित लाभार्थी असून, यासाठी तर, पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येते. मात्र, मोहिमेमध्ये काही अडचणी येत असल्याचे समोर येत आहे.
साई जन्मस्थानाबाबत आज मुंबईत बैठक
साई जन्मस्थान वादावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मुंबईत बैठक बोलावलेली आहे. पाथरी आणि शिर्डी परिसरातील नागरिकांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचं कारण नाही. मीसुद्धा साई भक्तांना आवाहन करतो की, यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही पवार म्हणाले.