मुख्यमंत्री ठाकरेंसह शरद पवार यांनी येडीयुरप्पांशी चर्चा करावी
कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय
बेळगाव – बेळगाव प्रश्नावर न्यायालयाचा अंतिम निर्णय येऊपर्यंत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून काही उपाययोजना कराव्यात. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असे मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरिही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले, मी येथून गेल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बेळगावची परिस्थितीबाबत माहिती देईन. बेळगावचा विषय 14 वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. तारखांवर तारखा पडत आहेत. आता एकदा प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्याच्यावर राजकीय भाष्य करणे योग्य नाही. जसं राम मंदिराचा विषय असंख्य वर्षांनंतर न्यायालायतून सूटला. तसेच बेळगाव प्रश्नही न्यायालयाच्या माध्यमातून प्रश्न सुटावा. महाराष्ट्र सरकारने बेळगावचा खटला लढण्यासाठी हरिश साळवे यांची नियुक्ती केली आहे. ते सर्वोत्कृष्ट वकील आहेत. आता तर त्यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणूनही नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. बेळगवाच्या जनतेने 70 वर्षे फार संघर्ष केला. प्रसंगी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे आता या प्रश्नावर उद्धव ठाकरे येडियुरप्पांशी चर्चा करतील. या प्रश्नावर सध्या तातडीने एक बैठक होऊन काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे. तरच या भागातील मराठी भाषिक जनता सूटकेचा श्वास सोडेल. विशेषत: मराठी भाषा, संस्कृती, साहित्य या संदर्भातील ही लढाई आहे. हे टिकायला हवं आणि ते टिकेल असे मला वाटते. कारण देशभरात आणि जगभरात मराठी भाषिक लोक राहतात. राजकारणाच्या दृष्टीने देखील त्यागोष्टी महत्त्वाच्या असतात, असेही त्यांनी नमूद केले.