निविदांचे दर जास्त; स्थायीने मागितल्या फेरनिविदा : नागरिकांना नळ जोडणीचा भार नको
नगर – शहरात पाणी पुरवठा योजना फेज 2 टाकण्यात आलेल्या जलवाहिनीतून नळ जोडणी नागरिकांना दिली लागणार असून, शहरातील जुनी पाणी पुरवठा योजना बंद करून शहरातील सर्व नागरिकांना नवीन नळ जोडणी करावी लागणार आहे. त्यासाठी ठेकेदारांनी दिलेल्या निविदांचे दर अवाजवी दिले असून, एका ठेकेदारासाठी नगरकरांना वेठीस दरल्याचा प्रकार होईल त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समितीने ठेकेदाराला फेरनिविदा सादर करण्यास सांगितले आहे.
महापालिकेच्या वतीने स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभापती मुद्दसर शेख, उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस.बी. तडवी, नगररचनाकार राम चारठणकर, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, दीपाली बारस्कर, संध्या पवार, सोनाली चितळे, मनोज कोतकर, गणेश कवडे, अमोल येवले, यंत्रअभियंता परिमल निकम, प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहेत्रे आदी उपस्थित होते. यात 28 विषय मांडण्यात आले.
नवीन जलवाहिनीतून नळ जोडणी कामाला साडेतीन हजार रुपयांपासून ते चार हजार 800 रुपये प्रती मीटर प्रमाणे दर आखण्यात आलेले आहेत. हे दर मीटर व्यतिरिक्त आहेत. हे दर कुणालाही परवडणारे नाहीत. असे म्हणत गणेश भोसले यांनी निविदेला विरोध केला. त्या प्रमाणे उपस्थित नगरसेवकांनीही या निविदा जास्त दराच्या असल्याचे सांगत या निविदेत सुधारणा करावी असे सुचविले.
मुद्दसर शेख यांनी नळ जोडणीसाठी कमी अंतर असल्यास कमी दर व जास्त अंतर असल्यास जास्त शुल्क हे प्रमाण ठेवावे अशी सूचना मांडली. यावर भोसलेनी शहरातील सर्व लोकांना नळजोडणी द्यायची असेल तर होलसेलचे दर ठेवा रिटेलचे नको अशा शेलक्या शब्दात निविदेचा दर फेटाळून लावला.
महापालिकेतील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामात दिरंगाई होत असल्याने संबंधित ठेकेदाराचा ठेका काढून फेरनिविदा काढण्याचेही सभेत ठरविण्यात आले. या कामासाठी एक कोटी रुपयांची निविदा असून आतापर्यंत 55 लाख रुपयांची बिले देण्यात आलेली आहेत.
स्थायी समितीच्या सभेत शहरात मोठ्या प्रमाणात बाकडे वाटप झाल्याचे बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडून सांगण्यात आले. त्यासाठीची बिलेही अदा करण्यात आलेली आहेत. यावर गणेश भोसले यांनी प्रभाग 14 मध्ये कुठे बाकडे बसविले आहेत ते सांगा. मला एकही बाकडा प्रभाग 14मध्ये पहायला मिळाला नाही असा आरोप करत त्यांनी महापालिकेला शहरात बसविलेल्या बाकड्यांचा लिखित हिशोबही मागितला.
अधिकाऱ्यांनीच केला गैरव्यवहाराचा गौप्यस्फोट
विनायक नगर व साईनगर भागातील उद्यानात पथदिवे बसविले जात नसल्याबाबत गणेश भोसले यांनी चिंता व्यक्त केली असता. इलेक्ट्रीक विभागाचे अभियंता कल्याण बल्लाळ यांनी इलेक्ट्रीक विभागात 50 मीटर वायर टाकून 300 मीटरची बिले ठेकेदार लावत आहेत. अशी बिले मंजूर कशी करायची असा प्रश्न विचारत. इलक्ट्रिक विभागातील कारभाराचा गौप्यस्फोट झाला.