शिरूर तालुक्यात बारमाही लपणक्षेत्रामुळे अनुकूलता
मांडवगण फराटा -शिरूर तालुका हा बागायती पट्टा असल्याने बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांसाठी जीवनावश्यक गोष्टींची मुबलकता उपलब्धता होत असताना या भागात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे.
शिरूर तालुक्यातील भीमा नदीचा पट्टा हा बारमाही बागायती असतो. या भागात मोठ्या प्रमाणात उसाची शेती असते. त्यामुळे बिबट्यांना राहण्यासाठी लागणारा आडोसा कायमचा तयार असतो. इथे मोठ्या प्रमाणात प्राणी असल्याने त्यांना भटकंती करावी लागत नाही. त्यामुळे हा भाग बिबट्या व इतर वन्यप्राण्यांसाठी हक्काचा निवारा बनत चालला आहे.
येथील शेतकरी मोठा प्रमाणात शेतीपूरक म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. त्यामुळे बागायती भागात छोट्या-मोठ्या जनावरांची संख्या मोठी आहे. शेतकरी आपापल्या सोयीनुसार शेतात राहत असल्याने चारही बाजुने उसाची शेती असते. घराशेजारी गोठा असतो. त्यामुळे बिबटे लहान जनावरांवर हल्ले करून आपले पोट भरतात. तसेच उसाबरोबरच येथील शेतकरी पालेभाज्या फळभाज्या व इतर पिके घेतात. ही पिके खाण्यासाठी रानडुकरांचे कळप या भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे रानडुक्कर व कुत्र्यांची बिबट्याकडून शिकार होत असते.
बिबट्यांना प्रजनन काळात येथील उसाचा मोठा आधार आहे. ऊस लहान असेपर्यंत शेतकरी आतमध्ये जाऊन पाणी देतो; मात्र पीक वाढल्यानंतर पाणी द्यायचे कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
भीमा नदीकाठी बागायती पट्ट्यात बिबट्याचे दर्शन तसेच शेतात वावर असल्याच्या पाऊलखुणा नागरिकांना मिळत असून या परिसरात बिबट्याच्या आगमनाने नागरिकांचा थरकाप उडण्यास सुरवात झाली आहे. सलग उसाचे मोठे क्षेत्र असल्याने या ठिकाणी बिबट्या हा मुक्त संचार करीत असल्याची गावकऱ्यांची माहिती आहे. वाड्या-वस्त्यावरून पुढे जाणारे रस्ते असल्याने नागरिकांच्या अंगाची गाळण होण्यास सुरवात झाली आहे. शेतात बिबट्याचे ठसे आढळल्याने शेतकरी भरदिवसा शेतात जाण्यास आता घाबरू लागले आहेत.
शिरूर तालुक्यामध्ये घोड नदी, भीमा नदी घोड धरण, चासकमान उजवा कालवा, डिंबा उजवा कालवा या परिसरात उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचे या भागात वास्तव्य असते. या शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला होण्याच्या घटना घडत आहेत. याचे पंचनामे करून वनविभागाच्या वतीने नुकसानभरपाई देण्यात येते. जांबूत (ता. शिरूर) येथील जोरीलवण येथे समृद्धी जोरी ही ठार झाली होती. तिच्या कुटुंबीयांना वनविभागाने मदत म्हणून पंधरा लाख रुपये दिले. वन्य प्राण्यांना डिवचू नका असे आवाहन वन विभागाने करण्यात आले आहे.
10 महिन्यांत 489 घटनांत 55 लाखांची भरपाई
शिरूर तालुक्यात 1 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2020 या कालावधीत वन विभागाने तब्बल 71 लाख 30 हजार 407 रुपयांची नुकसान भरपाईचे धनादेश शेतकऱ्यांना दिले आहेत. यामध्ये तब्बल 489 प्रकरणांमध्ये मृत झालेल्या मुलीच्या वारसांना 15 लाख रुपये, किरकोळ जखमी प्रकारात 12 हजार 907 रुपये, ऊस प्रकारात 22 हजार पाचशे रुपये, गाय म्हैस रेडा व बैल या प्राण्याच्या मृत्यु प्रकारात 22 हजार पाचशे रुपये, इतर मृत्यू (मेंढी, बकरी) या प्रकारात 504 प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी 10 प्रकरणे रद्द करण्यात आली. 484 प्रकरणे योग्य ठरवून त्यापैकी 478 प्रकरणात 55 लाख 60 हजार रूपयांची नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात आली. जखमी प्रकारात 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली असल्याची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.
मानव व बिबट संघर्ष कमी करण्यासाठी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत दररोज बिबट प्रवण भागात रात्रीची गस्त घातली जाते. या भागातील शाळा विद्यालय तसेच महाविद्यालयात जनजागृती केली जात आहे.
-मनोहर म्हसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर.
बिबट्याचा परिसरात वावर असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी तत्काळ उपाय कराव्यात.
-योगेश देशमुख, ग्रामस्थ कुरूळी (शिरूर)
रोज सहा ते सात पाळीव प्राण्यांवर हल्ला
शिरूर तालुक्यातील जांबूत येथील 2 वर्षाची समृद्धी योगेश जोरी ही लहान मुलगी 6 आक्टोबरला बिबट्याच्या हल्यात मृत झाली होती. तसेच इनामगाव येथे हिराबाई खळदकर या महिलेवर एक महिन्यापुर्वी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शिरूरच्या पूर्व भागात दररोज सहा ते सात पाळीव प्राण्यांवर हल्ला होत असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.