पिंपरी – वाकड, पिंपळे सौदागर हे शहरातील सर्वाधिक उच्चभ्रू परिसर मानले जातात. परंतु याच परिसरात पुरेसा पाणी पुरवठा करण्यात महापालिका अपयशी ठरली होती. यामुळे पालिका प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या प्रयत्नांमुळे येथील परिस्थिती बदलली असून पाणी पुरवठ्यात सुमारे 70 ते 80 टक्के सुधारणा झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता पाणी पुरवठा बरा असल्याचे समाधान स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
वाकड परिसरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात 70 ते 80 टक्के सुधारणा झाली आहे. पिंपळे सौदागर परिसरातील पाणी पुरवठ्यात देखील बऱ्याच अंशी सुधारणा झाली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी दिली. शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी घटल्या आहेत. तसेच, पाणीपुरवठा पूर्वीपेक्षा सुधारला असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाने सांगितले.
शहरात 3 हजार 869 सोसायट्या आहेत. महापालिकेतर्फे अपुरे, कमी दाबाने आणि अनियमित पाणी देण्यात आल्याने भर पावसाळ्यात काही सोसायट्यांना टॅंकरने पाणी मागवावे लागले. मोठ्या सोसायट्यांना उन्हाळ्यात दररोज 30 टॅंकरपर्यंत पाणी मागवावे लागत होते. हे प्रमाण पावसाळ्यात 8 ते 15 टॅंकरपर्यंत आले आहे. छोट्या सोसायट्यांना तुलनेत दररोज 3 ते 4 टॅंकर इतके पाणी लागत होते. टॅंकरसाठी सोसायट्यांना दरमहा एक लाखापासून पाच लाखापर्यंत खर्च करावा लागत होता. विशेषत: वाकड आणि पिंपळे सौदागर भागात हा प्रश्न बिकट झाला होता. शहरामध्ये सध्या महापालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करताना ज्या भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत होता त्या भागात जादा दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. विशेषत: वाकड आणि पिंपळे सौदागर परिसरात पाणी प्रश्नाची तीव्रता मोठी होती.
वाकड परिसरातील सोसायट्यांना जाणवणारा पाणी प्रश्न लक्षात घेता आमदार लक्ष्मण जगताप यांनी येथील सोसायटीधारकांना 31 मार्चपर्यंत मुबलक पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार येथील सोसायटीधारकांना मार्च अखेरपर्यंत मुबलक पाणीपुरवठा होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.