तक्रारी वाढल्यानंतर आली जाग : अनेक बड्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाचा ठपका
पिंपरी – नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे तसेच कार्यालयीन शिस्तीचा भंग करणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना चांगलेच महाग पडले आहे. गेल्या वर्षभरामध्ये महापालिकेतील दीडशे कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये महिन्याभरापूर्वी सारथीवरील तक्रारी न सोडविलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
कार्यालयीन शिस्तीचा भंग, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष आणि विविध फौजदारी खटले अशा विविध कारणांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 147 कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या कारवाईला मागील वर्षभरात सामोरे जावे लागले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मागील काही दिवसांत कार्यालयीन शिस्तीचा बोजवारा उडाल्याची ओरड सतत सुरू आहे.
प्रशासन आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांना वचक ठेवता आला नाही. त्यामुळे त्यांना वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनेक वेळा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी अधिकारी वर्गाला चांगलेच धारेवर धरले. तसेच महापालिकेच्या प्रशासनावर आयुक्तांचा वचक नसल्याची टीका ही केली. आयुक्त कारवाईसाठी धजावत नसल्याने अधिकारी, कर्मचारी त्यांच्याकडून वारंवार काढलेल्या आदेशालाही जुमानत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढल्या होत्या. तसेच नागरिक महापालिकेत आल्यानंतर त्यांचे काम होत नसल्याची अनेक उदाहरणे समोर आली होती. त्यातच नगरसेवकांनी प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई केली.
वेगवेगळ्या प्रकारची कारवाई
डिसेंबर महिन्यात सारथी प्रणालीवर येणाऱ्या विविध तक्रारींची अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. या कारणावरून दहा प्रमुख अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला होता. त्यात सहायक आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचा समावेश होता. त्यांच्यासह गतवर्षभराच्या कालावधीत त्यांनी एकूण 147 जणांवर विविध प्रकारची कारवाई केली आहे. त्यामध्ये सक्त ताकीद 12, दंडात्मक शास्ती 17, खातेनिहाय चौकशी 18, पदानवत करून चौकशी 30, सेवानिलंबन करून चौकशी 2, वेतनवाढ स्थगिती 59, सेवा समाप्त 7, फक्त पदानवत 2 अशा 147 जणांवर कारवाई झालेली आहे.
धास्तीने अधिकारी काम करणार का?
अनेक अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडे विविध तक्रारी करूनही नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. साधे काम असेल तरीही नागरिकांना वारंवार महापालिकेत चकरा मारायला लावले जाते. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाच्या व शिस्तभंगाच्या तक्रारी वाढल्यानंतर आयुक्तांनाही जाग आली आहे. मागील काही दिवसांत अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडका लावला आहे. मात्र मागील महिन्यात कारवाई करूनही नागरिकांच्या तक्रारींचा पाढा अद्याप तसाच आहे. त्यामुळे कारवाई करूनही अधिकारी व कर्मचारी काम करणार का? हा प्रश्न आहे.