राजगुरूनगर – मुसळेवाडी (कडूस, ता. खेड) येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून जनावरांच्या गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
मुसळेवाडी, कडूस, दोंदे, वडगाव पाटोळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून मुसळेवाडीत पाच दिवसांपूर्वी गोठ्यात बांधलेल्या वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना ताजी असताना बिबट्या पुन्हा कडूस-मुसळेवाडी (ता. खेड) येथील एकनाथ गारगोटे यांच्या गोठ्यात सोमवारी (दि. 13) सायंकाळी घुसला. मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला असल्याने परिसरातील लहान मुलांसह, महिला, ग्रामस्थ व पशुपालक शेतकरी दहशतीच्या छायेत जगत आहेत.
बिबट्याने बुधवारी (दि. 8) मध्यरात्री बाळू पांगारे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात वासरू ठार झाले. रक्ताला चटावलेला हा बिबट्या मुसळेवाडी परिसरात फिरत आहे. सोमवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्या वस्तीतील एकनाथ गारगोटे यांच्या गोठ्यात त्यांच्या मागे येऊन उभा राहिला. बिबट्याला पाहताच गारगोटे यांची बोबडीच वळली. घरासमोरच्या गोठ्यात बांधलेल्या गाई व म्हशीचे त्यांनी दूध काढले. काढलेले दूध गारगोटे हे घरात ठेवून बाहेर आले तेवढ्या वेळेत गोठ्यात बांधलेली म्हैस दोर तोडून दूर पळत होती.
म्हैस का पळाली हे गारगोटे यांच्या काहीच लक्षात आले नाही, एवढ्यात पाठीमागून बिबट्या गुरगुरल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांच्यापासून बिबट्या जेमतेम बारा फुटांवर उभा होता. हातातील वस्तू बिबट्यावर फेकून गारगोटे घरात पळाले. बिबट्या सुद्धा डोंगराच्या बाजूला पळून गेला. ग्रामस्थांनी घटनेची खबर दिल्यानंतर सरपंच जयश्री नेहेरे यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनरक्षक शिवाजी राठोड, एस. एस. लवंगे, एस. के. आरुन, एस. सी. कदम, पी. पी. शिंदे, ए. एस. वरुडे, एम. बी. बडे यांचा सहभाग असलेले वनविभागाचे पथक अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने परिसराची पाहणी केली व ग्रामस्थांना बिबट्यापासून सावध राहण्याबाबत सूचना दिल्या.