एकूण 50 जण अपघातग्रस्त
-विष्णू सानप
पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांची सार्वजनिक वाहतुकीची धुरा सांभाळणारी पुणे महानगर महामंडळाच्या (पीएमपी) बसचे मागील एका वर्षात 68 अपघात झाले आहेत. या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. तर, 50 जण यात दुखापतग्रस्त झाले आहेत. पीएमपी बसच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने शहरातील नागरिक व प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत पीएमपी प्रशासन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक म्हटले की, पीएमपी बसचे प्रामुख्याने नाव समोर येते. मात्र, पीएमपी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पीएमपीची अवस्था बिकट झाली आहे. आलीकडच्या काळात पीएमपीच्या सेवेपेक्षा समस्यांचीच चर्चा प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. यात, पीएमपी बसचे सातत्याने होणारे ब्रेकडाऊन, फुकटे प्रवासी, बस थांब्याची दुरवस्था, वाढते अपघात, वेळापत्रकातील अनियमितता व इतर समस्याने शहरातील पीएमपी प्रवासी हैराण झाले आहेत. यामुळे पीएमपीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने कमी होत असून, वेळीच पीएमपी प्रशासनाने यावर उपाययोजना केल्या नाहीत तर, परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान एकूण पीएमपी बसचे 68 अपघात झाले. त्यात, 5 जणांना प्राण गमवावा लागला. 14 गंभीर अपघात झाले असून त्यात 15 जन गंभीर जखमी झाले. तर, 30 व्यक्ती किरकोळ जखमी व 29 इतर पंचनामे झाले आहे. वर्षभरात 50 जण जखमी झाले आहेत.
शहरातील वाढत्या वाहतूक समस्येमुळे बसचे अपघात होत असल्याचे पीएमपी चालकांकडून सांगण्यात येते. आयुर्मान संपलेल्या व नादुरुस्त गाड्या चालकांच्या हवाली केल्या जात असल्याने अपघात वाढत असल्याचे महत्त्वाचे कारण नाव न सांगण्याच्या अटीवर पीएमपीच्या चालक-वाहकांनी सांगितले आहे. आता याबाबत पीएमपी प्रशासन काय भूमिका घेते व काय उपाययोजना करणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.
पीएमपीची अवस्था बघितल्यावर गाडी कुठे बंद पडेल हे सांगता येत नाही. काही महत्त्वाचे काम असल्यावर तिथे वेळेत पोचू की नाही अशी मनात भीती असते. पीएमपी प्रशासनाने लवकरात लवकर गाड्यांची स्थिती सुधारावी.
– मिलिंद जाधव, प्रवासी, कासारवाडी
पीएमपी प्रशासन नागरिकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. काही वेळा अपघात होतात. मात्र, याबाबत चालक-वाहकांना वेळोवेळी प्रशासनाकडून प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या काळात निश्चित अपघाताची संख्या कमी कशी होईल याबाबत पीएमपी प्रशासन उपाययोजना करीत आहे.
-प्रियांका सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी