रसरशीत मासोळी, स्पेशल मटन व चिकन आणि बिर्याणीसह अस्सल घरगुती जेवण मिळणारे ठिकाण म्हणून सासवडलगतच्या कुलस्वामिनी हॉटेलने खाद्य संस्कृतीत स्वत:चे चटकदार नाव केले आहे. येथे मिळणाऱ्या स्पेशल फिश थाळीसह बिर्याणी खाणाऱ्याला तोंडात बोटे घालायला लावते. चिकन,मटन थाळीलाही अस्सल गावरान चव असल्याने मासांहारी खवय्यै येथे फुरफरत ताव मारतात… येथील जेवणाच्या घरगुती चवीमागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. हॉटेल मालक चव्हाण कुटुंबीयांचे कष्ट लक्षात येतात.
पुरंदर तालुक्यातील खळद येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ हॉटेल व्यवसायाची आवड म्हणून या व्यवसायात उतरलेले हनुमंत चव्हाण हे आज केवळ ग्राहकांच्या जिभेची नव्हे तर मनाची चव ओळखून खास रेसीपीने मासांसाहारी जेवणाचे ताट तेवढ्याच आपुलकीने ग्राहकांना देत आहेत. यातूनच कुलस्वामिनी हॉटेल खवय्यांत सुप्रसिद्ध झाले आहे. त्यांनी तयार केलेल्या स्पेशल फिश थाळी, मटन, चिकन थाळीसह फिश बिर्याणीला ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर अशा पश्चिम पट्ट्यातील ग्राहक कुलस्वामिनीत ढेकर देत आहेत. हॉटेलात मालक म्हणून न वावरता ग्राहकांच्या स्वागतासह स्वत: पदार्थ तयार करण्यात चव्हाण यांना रस असल्याने प्रत्येक थाळी चविष्ट होते.
मालकापेक्षा कामगार म्हणून वावरताना यामागील कहाणी सांगताना चव्हाण म्हणतात की, बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका खासगी कंपनीमध्ये एच.आर. मॅनेजर पदावर नोकरी केली. मात्र, यादरम्यान हॉटेल व्यवसायाची असणारी आवड स्वस्थ बसू देत नव्हती. यामुळे ही नोकरी सोडून एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅन्टीनच्या माध्यमातून खानावळ व्यवसायात सुरू केला. हा व्यवसाय जोमात असताना कॉलेज बंद पडल्याने खानावळ बंद करावी लागली. मात्र, राज्यभरातून कॉलेजात विद्यार्थी येथे येत असल्याने चव्हाण यांच्या खानावळीत मिळणाऱ्या पदार्थ्यांची चव अवघ्या राज्यभरात पोहचली होती. त्यामुळे खानावळ बंद पडली तरी यातून हाच मोठा नफा मिळाल्याचे समाधान वाटत असल्याचे चव्हाण सांगतात.
खानावळीनंतर चव्हाण यांनी गावी शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेती करताना हॉटेल व्यावसायाची आवड कायम होती. यातून 2017 मध्ये सासवड शहरामध्ये स्पेशल घरगुती बिर्याणी या टॅगलाइन खाली कुलस्वामिनी हॉटेलची सुरुवात केली. येथे मिळणारी स्पेशल मटन थाळी, चिकन बिर्याणी, स्पेशल चिकन थाळी याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत गेला. ग्राहकांची गर्दी इतकी वाढत गेली की, व्यवसायासाठी तसेच पार्किंगसाठी जागा कमी पडू लागली. अशा वेळी चव्हाण यांनी शहराबाहेर कऱ्हा नदीलगत निसर्गरम्य वातावरणामध्ये ग्राहकांच्या खास आग्रहास्तव सासवड-जेजुरी पालखी महामार्गलगत प्रशस्त जागेत कुलस्वामिनी हॉटेलचा विस्तार केला.
सध्या, याठिकाणी पुरंदर तालुक्यातील स्थानिक ग्राहकांबरोबरच पुणे जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून खवय्ये खास मच्छी थाळी तसेच कुलस्वामिनी चिकन थाळी तसेच बिर्याणीची चव चाखण्यासाठी येत आहेत. तसेच, वाढदिवसासह अन्य समारंभ, पार्टी यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, प्रशस्त पार्किंग सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहक कुलस्वामिनी हॉटेलला पसंती देत आहेत.