हेमंत देसाई
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची सुरक्षा मोदी सरकारने कमी केली आहे; परंतु व्यक्तिशः याचा बाऊ न करता व स्वतःला पोलिसांनी दिलेली वागणूक बाजूला ठेवून, उत्तर प्रदेशातील सामान्य माणसाच्या सुरक्षिततेच्या मागणीवर प्रियांकांनी भर दिला आहे.
कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यात इंदिरा गांधींची आक्रमकता आणि नेतृत्वगुण आहेत, हे कोणीही नाकारणार नाही. गोरगरीब आणि दलित, मुस्लीम व आदिवासींबद्दलची कणव बाळगण्यात आणि त्यांच्यावर अत्याचार झाल्यास धावून जाण्यात त्या नेहमीच पुढे असतात. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात लखनौमध्येही आंदोलन झाले. त्यात सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी प्रियांका दिल्लीहून तेथे जात होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना निष्कारण अटकाव केला. तेव्हा प्रियांकानी स्कूटरवरून त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला व तसा तो राबवला. परंतु त्यावेळी आपला गळा पकडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, असा आरोप प्रियांका यांनी केला आहे. देशातील एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या महिला नेत्याचाच हा अनुभव असेल, तर सर्वसामान्य माणसाची सुरक्षितता कितपत असेल, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. तुम्ही मला रस्त्याच्या मधोमध कसे अडवू शकता? यामुळे अपघात होऊ शकला असता, असे उद्गार प्रियांका यांनी काढले. त्या स्कूटरवर असताना पोलिसांनी त्यांना घेरले. त्यामुळे त्या तिथून उतरून चालत गेल्या.
उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आनंदी आनंद आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपशासित राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण बिलकुल कमी झाले नाही. परंतु आपल्या अन्य कामात चुकारपणा करणाऱ्या पोलिसांनी प्रियांकांना विनाहेल्मेट स्कूटरवरून नेणाऱ्या चालकास व स्कूटरच्या मालकास आर्थिक दंड केला आहे. वास्तविक उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. अशावेळी प्रियांका यांची भीती बाळगण्याचे कारण काय? मात्र, भाजपला कॉंग्रेस पक्षापेक्षा नेहरू-गांधी घराण्याचा अत्यंतिक तिरस्कार आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष म्हणजे “दंगा करो पार्टी’ आहे आणि प्रियांका यांची नौटंकी मते मिळवून देणार नाही, अशी शेरेबाजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केली आहे. वास्तविक पोलिसांनी गळा पकडून धक्काबुक्की केल्याचा जो आरोप प्रियांका यांनी केला आहे त्याची आम्ही चौकशी करू, असे त्यांनी म्हणणे आवश्यक होते.
उत्तर प्रदेश हे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक आहे, अशी भावनात्मक भाषाही मौर्य यांनी केली आहे. वास्तविक राम मंदिर आंदोलनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात भाजपने हिंसक धिंगाणा घातला होता, हे लोक विसरलेले नाहीत. प्रियांका या मुसलमानांचे लांगूलचालन करत असून, दंगेखोरांचे समर्थन करत आहेत, असे तारे राज्याचे दुसरे एक उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी तोडले आहेत. नागरिकत्व कायद्याविरोधी आंदोलकांचा सूड घ्या, असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले होते. म्हणजे भडकावू भाषा केली, ती त्यांनी. उलट योगीजींच्या भगव्या वस्त्रांचा उल्लेख करून, तुम्ही खऱ्या हिंदू धर्माप्रमाणे आचरण करा, हिंदू धर्मात सूड व हिंसेला जागा नाही, असे आवाहन प्रियांका यांनी केले. मात्र, प्रियांका यांच्या वक्तव्याचा विपर्यास शर्मा यांनी केला आहे. भगवा रंग हा हिंसक प्रवृत्तींस चालना देऊन देशात अशांतता माजवतो, असं प्रियांकाना म्हणायचं आहे, असा पूर्णपणे चुकीचा अर्थ शर्मा यांनी लावला आहे.
देशात विरोधी पक्षांना आपले म्हणणे मांडण्याचा, आंदोलन करण्याचा आणि पीडितांना भेटण्याचा अधिकार नाही का? “भारतमाता की जय’ म्हणणाऱ्यांनाच देशात स्थान, असे उद्गार पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काढले आहेत. कोणालाही, कधीही व कुठेही “भारतमाता की जय’ म्हणायला सांगायचे आणि प्रतिसाद न दिल्यास त्याला मारहाण करायची, हा अनुभव गेली पाच वर्षे देश घेतो आहे. राष्ट्रभक्तीची सर्टिफिकिटे वाटण्याचा सपाटा भाजपच्या नेत्यांनी लावा आहे. ऊठसूट कोणालाही देशद्रोही वा शहरी नक्षलवादी संबोधले जात आहे. नागरिकत्व कायद्यासंदर्भातील आंदोलकांना “तुम्ही पाकिस्तानात चालते व्हा’, असा आदेश मेरठचे पोलीस अधीक्षक अखिलेश नारायण सिंग यांनी दिला.
सध्याच्या वातावरणात जनतेत या कायद्याबद्दल विश्वास निर्माण करण्याची गरज असताना, अखिलेश सिंग यांनी केलेले वक्तव्य हे लोकांच्या विश्वासाला तडा देणारे आहे. त्यांच्या या उद्गाराबद्दलचा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे केंद्रीय अल्पसंख्य कामकाज खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे आश्वासन दिलासादायक आहे. नागरिकत्व कायद्याविरुद्धच्या लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत, की पंतप्रधान नरेंद्र मोदी “खेलो इंडिया’चे उद्घाटन करण्यासाठी दहा जानेवारीला गुवाहाटीत आल्यास, तीव्र निदर्शनांचा इशारा “आसू’ संघटनेने दिला आहे. “युवक व्यवस्थेवर विश्वास ठेवतात, व्यवस्थेला प्रश्नही करतात, परंतु युवकांना अराजकता, अव्यवस्था नापसंत आहे’, असे प्रतिपादन मोदींनी नुकतेच “मन की बात’मध्ये केले आहे. परंतु त्यांच्या पक्षातच काही अराजकतावादी प्रवृत्ती आहेत. प्रथम त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न मोदींनी करावा. साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी प्रज्ञासिंह अशी कितीजणांची नावे घ्यायची?