नवी दिल्ली – केंद्र सरकारने पुढील पाच वर्षात पायाभूत सुविधांसाठीचे एकूण 102 लाख कोटी रूपयांचे प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पांशी संबंधीत 70 घटकांशी चर्चा करून चार महिन्यांत आम्ही हा आराखडा तयार केला आहे असेही त्या म्हणाल्या. गेल्या सहा वर्षात केंद्र व राज्य सरकारांनी पायाभूत सुविधांवर एकूण 51 लाख कोटी रूपये खर्च केले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
या प्रकल्पांपैकी 39 टक्के प्रकल्प केंद्र सरकार, 39 टक्के प्रकल्प राज्य सरकार आणि उर्वरीत 22 टक्के प्रकल्प खासगी क्षेत्रांद्वारे राबवले जाणार आहेत. यातून उर्जा, रेल्वे, नागरी पाटबंधारे, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक सरकारने वाढवल्यानंतर आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.