नवीन नागरिकत्व कायदा संविधानाच्या मूळ तत्त्वाला छेद देणारा
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरकारकडून मौन
पुणे -“कॉंग्रेस सरकारने नागरिकत्व आणि नागरिकत्व नोंदणी कायदा प्रस्तावित केल्याचे, हे जरी सत्य असले तरी आमच्या कायद्यात आणि भाजपच्या कायद्यात मोठी तफावत आहे. भारतीय जनता पक्ष राबवित असलेला कायदा हा संविधानाच्या मूळ तत्त्वाला छेद देणारा आहे, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले. भाजप समर्थक राज्यांमध्येच नागरिकत्वाचा कायदा लागू करण्यासाठी अनुकूलता नाही, तर राजस्थान हा कायदा लागू का करेन? असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुणे भेटीवर आलेल्या पायलट यांनी गुरुवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पायलट म्हणाले, “भाजप सरकारचा नागरिकत्व कायदा हा धर्माच्या आधारावर करण्यात आलेला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात अशाप्रकारे धर्मावर आधारित कायदे करणे योग्य नाही. बराच काळानंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एखाद्या कायद्याला विरोध करत आहेत. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी हे सरकार त्याबाबत मौन बाळगत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे’.
अशी कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीये, जे सरकारला इतक्या आक्रमकतेने हा कायदा लागू करावा लागत आहे? असा प्रश्न पायलट यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, देशाची आर्थिक परिस्थिती सातत्याने बिघडत आहे. त्याबाबत चर्चा तसेच परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी भाजप सरकार “सीएए’सारखे मुद्दे उपस्थित करत लोकांचे लक्ष भरकवट आहे, असा आरोपही त्यांनी केला.