अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार. प्रभाकर बागुल लिखित “महासती राणी पुतळा’ ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित झाली अन लोकांनी झपाटल्यासारखी ती वाचून काढली अन अजूनही वाचतच आहेत. याला अनेक कारणे आहेत. खरं तर राणी पुतळा हे शिवकालीन उपेक्षित राहिलेले पण तितकेच महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व.
छत्रपती शिवरायांची तिसरी राणी, सर्वसाधारण रूप पण सोशिक स्वभाव, यामुळे पुतळाबाई कायम एक संयमी, त्यागमूर्ती स्त्री म्हणून सर्वांच्या लाडक्या झाल्या. सईबाईंचे लहानग्या शंभूबाळाला सोडून जाणं, शिवरायांच्या आयुष्यात सर्वात मोठी पोकळी निर्माण झाली. शंभूराजांना प्रेमाची गरज होती; अन अशा वेळी त्यांचे सर्वस्व झाल्या त्या पुतळाबाईसाहेब.
महाराजांनी स्वतःच्या संसाराला फारसे महत्त्व कधी दिलेच नाही कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेतला होता, स्वतःच्या संसारापेक्षा स्वराज्याचा संसार त्याना मोलाचा वाटत होता. अशावेळी सोयराचे राजकारण दुर्लक्षित झाले, पुतळाचे चांगुलपण दुर्लक्षित झाले यात नवल ते काय? शिवपुत्र शंभुराजे सईबाईंच्या जाण्याने पोरके झाले, जिजाऊंचे प्रेम आधार होताच, पण आईचे ममत्व, तिचा मायेचा पदर त्यांच्या नशिबी नव्हता.
महाराज सतत मोहिमेवर असल्याने पित्याचे प्रेमही कमीच लाभलेले, अशा वेळी महाराज फक्त संयमी, मायाळू, सेवेसाठी तत्पर पुतळाबाईनंवर भरोसा ठेवत. जिजाऊच्या लाडक्या, शंभूबाळाच्या सल्लागार, एक हिंदू धर्मपत्नी कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे पुतळामहाराणी.
इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या या राणीबद्दल हे पुस्तकं अनेक बारकावे नजरेत आणून देते, पुस्तकाची भाषा ऐतिहासिक काळाशी सुसंगत असली तरी समजण्यासाठी सोपी आहे. पतीच्या निधनानंतर सती जाणाऱ्या पुतळा राणी जेंव्हा निर्धाराने ठाम होतात तेंव्हा त्यांचे तेज, धडाडी आपणास नतमस्तक होऊन मुजरा करण्यास भाग पडतातच पण नकळत अश्रूचा अभिषेकही करावयास लावतात.
स्वराज्याच्या घडामोडीत काही राजस्त्रियांचे त्या काळी फार मोलाचे स्थान नसेलही; पण त्यांचे एक ठराविक भावविश्व नक्कीच होते. पुतळाबाईंचे कार्य दिसत नसले तरी महान आहे. पतीच्या चरणावर श्रद्धा ठेवणाऱ्या, संभाजीराजांना आईची
निःस्वार्थ ममता देताना स्वतःच्या आयुष्याची होळी करणाऱ्या महाराणी सती पुतळाबाई यांच्या उच्चस्तरीय निष्कपट प्रेमाला जगात तोड नाही, म्हणूनच महाराणी पुतळा बाईंचे हे चरित्र मनाला भावते, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. सायली प्रकाशनचे हे पुस्तकं अतिशय छान आणि महत्वपूर्ण माहिती देणारे आहे.
– मनिषा संदीप