स्त्रीला कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घ्यायला जमतं; किंबहुना ते तिला वरदानच आहे! आता बघा ना 20-22 वर्षे लाडाने वाढवलेल्या आईबाबांना, घरादाराला सोडून ती लग्न झाल्यावर सासरी जाते. मग तिथल्या रितीरिवाजांशी ती जुळवून घेते. पण नंतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना ती तडजोड करायला सुरुवात करते.
सकाळी नवऱ्याचा , मुलांचा डबा , सगळ्यांच चहापाणी करुन तिचं सगळं आवरेपर्यंत तिला उशीर होतो. मग ती स्वतःसाठी नाश्ता करतच नाही. दुपारच्या जेवणापर्यंत ती उपाशीच राहते.कोणी विचारलं, ‘ नाश्ता केला का?’ मग म्हणते ,’ नाही केला. मला चालतं.’ मग हे चालतं पुढे पुढे चालतच राहतं.
जेवण कधी कमी पडतंय, असं वाटलं की ही म्हणणार, ‘तुम्ही जेवा. मला भूक कमी आहे. वाटलंच तर मी दूध-पोहे खाईन. मला चालतं.’ तर मुलं मोठी झाल्यावर शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेली आणि नवऱ्याला कुठे जेवायला जायचं असेल किंवा कंपनीतन जेवून येणार असेल, तर ही दुपारचं शिल्लक असेल ते खाते किंवा दुध-ब्रेड असं खाते वर म्हणणार ‘एकटीसाठी कुठे करत बसणार? मला चालतं. रात्रीचं जरा कमीच खाल्लेलंच बरं.’ पण ती हे “चालतं-चालतं’ करत चालत रहाते आणि मग अचानक काही तरी थांबतं. आहाराकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे काही तरी आजार निर्माण होतात.
पत्नी, आई, सून या भूमिका बजावता-बजावता ती स्वतःसाठी जगायची विसरते. मग वय झाल्यावर वाटतं, अरेरे आपण किती गोष्टी केल्याच नाहीत. आता साधी गोष्ट कॉफी आवडणारी बाई नवऱ्याला चहा लागतो म्हणून चहा बनवते. कुठे दोन-दोन करत बसायचं? मग कोणी मैत्रिण बरेच दिवसांनी भेटली, आणि हिला चहा पिताना बघितलं आणि विचारलं की, तुला कॉफी लागायची ना… नि आता चहा पितेस?’ मग ही म्हणणार “हो, मला चालतो.’ आर्थिक परिस्थिती नसली तर ती मुलांची हौस भागवण्यासाठी स्वतःची हौस बाजूला ठेवते. आधी मुलांना नवीन कपडे घेते आणि मग तेव्हा सुध्दा म्हणते, ‘मला मिळालेल्या साड्या आहेत. मला चालतात त्या! कशाला नवीन घ्यायच्या?’
संसाराची जबाबदारी सांभाळताना तिला तारेवरची कसरत करावी लागते. मग तिचं स्वत:कडे लक्षच नसतं. लग्नापूर्वी छान आवरुन, हलकंस परफ्यूम, केसात गजरा माळणारी ती, लग्न झाल्यावर काही वर्षांत कुठली तरी साडी किंवा हाताला मिळेल तो ड्रेस घालून बाजारात जाते. वर म्हणणार, ‘कोण बघतंय आता? चालतंय.’ पण म्हणजे खाणेपिणे, राहणीमान या सगळ्यांशी ती “मला चालतं’ म्हणत तडजोड करते आणि मग स्वतःसाठी जगायला विसरते.
तर आता हे चालवू नका.स्वत:च्या आवडीचे पण पदार्थ करून खा. छान आवरून फिरायला जा. मला चालतं म्हणता म्हणता आयुष्य पण चालतंय की! ते थांबत नाही. तर मस्त जगा आणि “मला चालतंय’च्या ऐवजी मला हवंय किंवा मला लागतं असं म्हणत छान आयुष्य जगा.
– अचला धारप