रांजणी – आंबेगाव तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांबरोबरच विशेषत: पशुधनावर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने या भागातील पशुधन धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्यानी केलेल्या हल्ल्यात शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झाले असून बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे तालुक्यात दहशत निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
महाळुंगे पडवळ येथील बेंडवस्तीवरील शेतकरी अनिल चांगदेव चासकर यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात मंगळवारी पहाटे बिबट्याने हल्ला चढविला. त्यामध्ये दहा बकऱ्यांचा बळी गेला, त्यामुळे शेतकरी चासकर यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. दोन तीन दिवसांपूर्वी बिबट्याची एक मादी तालुक्यातील थोरांदळे-लौकी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यूमुखी पडली. अर्थात ही बिबट्याची मादी भक्षाच्या शोधात परिसरात फिरत होती. तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील घबराट निर्माण झाली आहे.
सध्या ऊसतोड हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत ऊसाच्या शेतात लपून राहिलेले बिबटे लपण्याची जागा नष्ट होत असल्याने मानवी वस्तीवर वावरू लागले आहेत. त्यामुळे बिबटे रात्रीचेच नाही तर ते दिवसाढवळ्या देखील नागरिकांना दिसू लागले आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी वनखात्याने उपाय योजना राबविणे गरजेचे आहे, मात्र वनखाते सुस्त असल्याचे दिसून येते.
पशुधन किंवा माणसांवर बिबट्यांनी हल्ला केल्याचे वनखात्याला जणूकाही काही देणेघेणेच नाही असाच काहीसा प्रकार वनखात्याच्या बाबतीत दिसून येतो. वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसात पशुधनावर सातत्याने होत असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण दिसून येते.
तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून मनुष्यहानी होण्याची शक्यता देखील आता नाकारता येत नाही, कारण यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनेक शेतकरी, नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. वनखात्याने बिबट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. बिबट्याने पाळीव जनावर अथवा माणसांवर हल्ला केला तर बिबट्याला कोणतीच सजा नाही, कारण बिबट्यांचे संवर्धन करणे शासनाची जबाबदारी आहे. परंतु बिबट्याला माणसाने ठार केले, मारले तर त्याला सजा होते. याबाबत देखील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येते.
– संदेश थोरात, सरपंच लौकी.