– संदीप घिसे
पिंपरी – मीना आणि मनोज (काल्पनिक नावे) यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. वेळोवेळी भेटण, दररोज फोनवर बोलणे सुरू होत. दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला बहर येत होता. मात्र त्यांच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली. मीनाच्या घरात तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. एकदिवस पाहूणेही बघायला आले. मुलीच्या घरच्यांना पसंती कळविली. मुलीचे लग्न होणार असल्याने आई-वडिलही खूश होते. मात्र मीना सतत चिंतेत होती. आपल एका मुलावर प्रेम असून त्याच्याशी लग्न करणार असल्याचे कोणाला आणि कसे सांगावे? आपण घरात सांगितल्यावर काय होईल हे तिला माहिती नव्हते. कारण तो वेगळ्या जातीचा होता. एक दिवस वडिलधाऱ्यांनी मीनाचा साखरपुडाही केला. लग्नाची खरेदी झाली. अखेर मीनाला राहवल नाही आणि तिने मनोजवर असलेल्या प्रेमाची माहिती मामाला सांगितली. घरात अपेक्षेप्रमाणे मोठा गदारोळ झाला.
लवकरच लग्नाची तारीख काढणार असल्याने आपल्या मुलीने साखरपुडा झालेल्या मुलाशी लग्न करावे, यासाठी तिच्या आईने फेब्रुवारी महिन्यात पोलिसांच्या “महिला सहाय्यक कक्षा’कडे अर्ज केला. पोलीस उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांच्या सुचनेनुसार पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड आणि अनिता जाधव यांनी मीना, मनोज आणि दोघांच्याही आई-वडिलांना समुपदेशनासाठी बोलविले. समुपदेशक शुभांगी कदम यांनी त्या दोघांशी चर्चा केल्यावर ते दोघेजण लग्नासाठी तयार असल्याचे समजले. त्यानंतर मनोजच्या आईवडिलांशी चर्चा केल्यावर मनोज हा लग्नाला तयार नसल्याचे सांगितले. तुम्हीच त्या मुलीला नकार द्या, असे त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. त्यानंतर समुपदेशक शुभांगी कदम यांनी मीना, मनोज आणि दोघांच्याही आई-वडिलांना समोरासमोर बोलविले. त्यानंतर मनोज आपल्या आई-वडिलांच्या माध्यमातून लग्नास नकार देत असल्याचे सत्य सांगितले.
मनोजला प्रेम हवे होते मात्र लग्न करायचे नव्हते. त्याच्या या कृतीमुळे मीनाला प्रचंड मानसिक धक्का बसला. ज्याच्यासाठी आपण आई-वडिलांच्या विरोधात जात होतो तोच आपल्याशी गेम खेळत असल्याचे तिला समजले. संतापलेल्या मीनाने सर्वांसमक्ष मनोजचे तोंड फुटेपर्यंत थोबाडीत मारले. काही वेळानंतर तिचा राग शांत झाल्यावर तिने आपल्या आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न करण्यास होकार दिला. पोलीस कर्मचारी अपर्णा शिंदे यांनी मनोज आणि मीना यांच्या मोबाईलमधील ऐकमेकाचे फोटो व इतर मजकूर डिलिट करून टाकले. पोलीस नाईक प्रदीप वासाळे यांनी मनोजला पोलिसांच्या भाषेत तंबी देत भविष्यात एकमेकांना त्रास होणार नाही, अशी लेखी हमी पोलिसांनी त्या दोघांकडून घेतली.
त्यानंतर मीनाचे लग्न झाले. आता तिचा संसार सुखाचा सुरू आहे. “फक्त विस्कटलेले संसार आम्ही सावरत नाही तर भविष्यात विस्कटणारेही संसार अगोदरच सावरल्याचे समाधान मिळाले’, असे पोलीस उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांनी दै.”प्रभात’शी बोलताना सांगितले.
दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं, पण घरच्यांना ते माहिती नव्हतं. तिच लग्न घरच्यांनी ठरवलं. साखरपुडा उरकून लग्नाची खरेदीही झाली. मात्र, ती लग्नाला तयार नव्हती. तिला प्रियकरासोबतच लग्न करायचं होतं. आम्ही ठरविलेल्या मुलाशी आपल्या मुलीने लग्न करावं, यासाठी आईने पोलिसांकडे अर्ज केला. पोलिसांनी घेतलेल्या सुनावणीत धक्कादायक वास्तव समोर आले. त्याला प्रेम पाहिजे होते, पण लग्न करायचं नव्हतं. तो केवळ तिच्या भावनेशी खेळत होता. पोलिसांच्या समोर उघडकीस आलेल्या वास्तवानंतर “त्या’ मुलाला “तिने’ पोलिसांसमक्षच तोंड फुटेपर्यंत मारले आणि राग शांत केला. यानंतर मीनाने आई-वडिलांचे ऐकले आणि त्यांनी ठरविलेल्या मुलाशी विवाह केला. त्यामुळे प्रेम करावे पणं आपली कोण फसवणूक तर करत नाही ना, यासाठीसुद्धा दक्ष राहिले पाहिजे.