सुरेश डुबल
महिना उलटूनही बिलांचा पत्ता नाही ; शेतकऱ्यांच्या नजरा दराकडे
अजिंक्यताराने बाजी मारली
जिल्ह्यातील कारखाने सुरु होऊन महिना झाला, तरीही कारखान्यांनी आपल्या ऊस दराची कोंडी फोडली नाही. मात्र नुकताच सातारा येथील अजिंक्यतारा कारखान्याने दोन हजार पाचशे रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. जिल्ह्यातील ऊस दराची पहिली कोंडी या कारखान्याने फोडली. आता अन्य कारखाने ऊस दराची कोंडी कधी फोडणार? याकडे लक्ष लागून आहे.
कराड – जिल्ह्यातील ऊस कारखाने चालू होऊन महिना झाला तरी कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फोडली नाही. त्यामुळे आधीच महापूर व ओल्या दुष्काळामुळे अडचणीत आलेला शेतकरी कारखानदारांच्या आडमुठेपणामुळे आणखीनच अडचणीत आलेला आहे. या ऊस दराची कोंडी फोडून गाळप झालेल्या ऊसाचे पैसे खात्यावर लवकरात लवकर जमा करावेत याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र हा ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यात तब्बल 16 ऊस गाळप कारखाने अस्तित्वात आहेत. त्यापैकी यंदा झालेल्या अवेळी व अति पावसामुळे या 16 पैकी 14 कारखान्यांनी आपले गाळप हंगाम सुरु केला. मागील वर्षीपेक्षा यंदा हवामानाच्या दुष्परिणामामुळे कारखाने एक महिना उशिरा चालू झाले. आता हे कारखाने चालू होऊन एक महिना होत आला, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळताना दिसत नाही.
यावर्षी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. परिणामी ऊसाचे क्षेत्र घटले. मात्र यातून जे ऊसक्षेत्र वाचले आहे. या गाळपासाठी गेली महिन्याभरापूर्वी कारखाने सुरु झालेत. मागीलवर्षी एफआरपी अधिक दोनशे रुपये असा दर कारखान्यांनी काढला होता. मात्र या एफआरपीचे तुकडे गेल्या काही वर्षांपासून केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम न मिळाल्याने तोकडे पैसे मार्गी लागण्यास अडचणी येत आहेत.
यावेळी ऊस क्षेत्र कमी असल्याने कारखानेही मागील हंगामापेक्षा कमी चालणार आहेत. त्यात प्रत्येक कारखाना आपले गाळप क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. सातारा जिल्ह्यासह परिसरातील सांगली व कोल्हापूर या भागातील कारखानेही आपापला कोटा पूर्ण करण्यासाठी ऊसाची पळवापळवी करण्याची शक्यता आहे. असे असले तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊसाच्या पळवापळवीशी काहीही देणंघेणं नाही.
फक्त आपल्या ऊसाचे वेळेत गाळप व्हावे व योग्य भाव मिळावा, एवढीच माफक अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यांना घालवला आहे खरा. परंतु त्या कारखान्यांनी लवकरात लवकर ऊसदराची कोंडी फोडून ऊसाचे पैसे खात्यावर जमा करावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून जोर धरीत आहे.
शेतकरी संघटना गारठल्या
मागील काही वर्षापासून शेतकरी संघटनांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य तो भाव मिळू लागला. मात्र या आंदोलनात शेतकरी संघटनेतून काही नेते उदयाला आले. त्यातील काही नेते सत्तेत जाऊन बसल्याने आता म्हणावा असा जोर शेतकरी संघटनांकडून लागेना झालाय. परिणामी कारखानदार व सरकार झुकताना दिसत नाही. मागील महिन्यात राजू शेट्टी यांनी ऊस परिषद घेतली, मात्र अजूनही ऊसदराचा तिढा सुटलेला नाही.