गणेश घाडगे
दोनदा कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभ नाही : योजनेचा उडाला बोजवारा
नेवासा – संगणकीय सात-बारा उताऱ्यामधील दोष, कागदपत्रांतील तसेच ऑनलाइन अर्ज भरताना झालेल्या चुका आदी विविध कारणांमुळे अनेक शेतकरी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. दोन-दोन वेळा कागदपत्रांची पूर्तता करून व ऑनलाइन अर्ज भरून देखील बहुतांश शेतकऱ्यांची नावे अद्यापही या योजनेच्या पात्र लाभार्थींच्या यादीत आली नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
दोन हेक्टरच्या आत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिकसाह्य म्हणून तसेच त्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
प्रतिहप्ता दोन हजार रुपये, असे तीन टप्प्यांत सहा हजार रुपये प्रतिवर्षी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर संनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत पात्र शेतकऱ्यांची निवड करून त्यांचे ऑनलाइन अर्ज शासनाकडे पाठविण्यासाठी युद्धपातळीवर ऑनलाइन अर्ज भरण्यात आले.
काही शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला, दुसरा, तसेच तिसरा हप्ताही मिळाला आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकरी या योजनेच्या लाभ पासून वंचित आहेत. या योजनेचा लाभ का मिळाला नाही, याच्या चौकशीसाठी संबंधित शेतकरी बॅंकेसह तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मदतीपासून वंचित असणारे शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करून तलाठी कार्यलयाकडे हेलपटे मारत आहेत.
तालुक्यातील अधिकाऱ्यांनी झटकला हात
तहसीलदारांकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मी मिटिंगसाठी बाहेर असल्याने तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, असा सल्ला दिला. तालुका कृषी अधिकारी मोबाइल उचलत नाहीत. त्यामुळे तालुक्यात शेतकरी सन्मान योजना निधीची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे तालुक्यातील अधिकाऱ्यांनी सपशेल हात झटकले असल्याचेच चित्र पहायला मिळत आहे.