बोगस प्रमाणपत्र आढळल्याने घेतला संस्थांनी धसका
नोकरी वाचवणाऱ्या इतर शिक्षकांमध्ये कारवाईची भीती
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे गेल्या दोन महिन्यांत शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) केवळ एकच प्रमाणपत्र तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. बृन्मुंबई येथील चार शिक्षकांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर बहुसंख्य शाळांनी धसकाच घेतला आहे.
सन 2013 पासून प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी “टीईटी’ उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे. आतापर्यंत 5 वेळा या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. यात एकूण 69 हजार 709 उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत. 31 मार्च 2019 पर्यंत “टीईटी’ उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचनाही शिक्षकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यात फारशा शिक्षकांना यश मिळालेले नाही. नोकरी वाचवण्यासाठी काही शिक्षकांनी “टीईटी’ उत्तीर्ण झाल्याची बोगस प्रमाणपत्रे दाखल केल्याच्या तक्रारी राज्य परीक्षा परिषदेकडे येऊ लागल्या होत्या.
त्याची गांभीर्याने दखल घेऊन परिषदेने सर्व शाळांमधील शिक्षकांची “टीईटी’ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी दाखल करण्याबाबतचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले होते. याचे पालन करत बृन्मुंबई शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रे दाखल करण्यावर भर दिला होता. दीड वर्षांत 306 प्रमाणपत्रे दाखल झाली होती. यातील चौघांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले.