नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेला डिवचल होते. शिवसेना सत्तेसाठी किती लाचारी पत्करणार असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या टीकेला कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
थोरात म्हणाले, राज्यातील जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. अधिवेशनाचा वापर ते सोडवण्यासाठी व्हावा. तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. पण, महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे. भाजपाने पाच वर्षे सत्ता चालवली. त्यांनी कर्जमाफी दिली होती. पण, ती शेतकऱ्यांना मिळाली नाही. आम्हाला प्रश्न विचारू नये.
आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ. राहुल गांधी यांनी भूमिका मांडताना इतिहासाचा दाखला दिला. त्यावर शिवसेनेने त्यांची भूमिका मांडली. भावाभावांमध्येही काही बाबतीत एकमत नसते. मात्र, भाजपा केवळ आमच्यात मतभेद वाट पाहत आहे, असे थोरात यांनी सांगितले.