शिक्रापुरात मलठण फाटा परिसरात कचरा हटविण्याची नागरिकांची मागणी
शिक्रापूर (वार्ताहर) – येथील चासकमान वसाहत परिसरातील मनिषा विहार व जवळील भागामध्ये असलेल्या चासकमान कालव्याच्या चाऱ्यांमध्ये मोठमोठी झाडे वाढलेले असून कचऱ्याचे ढीग साचले असून येथील कचरा हटविण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
मलठण फाटा परिसरात चासकमान कार्यालयाच्या जवळच असलेल्या चासकमान कालव्यांमध्ये येथील नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याचे मोठमोठे ढिग साचले असून कालव्यामध्ये मोठमोठी झाडे, झुडपेदेखील वाढलेली आहेत. त्यामुळे येथील परिसरात डासांचे आणि साथीच्या आजारांचे साम्राज्य पसरले आहेत, त्यामुळे येथील कचरा हटवून कालव्यातील झाडे काढावित, अशी मागणी येथील उद्योजक प्रवीण शिवरकर व आण्णा पडवळ यांनी केली आहे. येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे येथील नागरिक व शालेय मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर येथील कचरा हटविला नाही तर नागरिकांना मोठ्या आजारांशी सामना करण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर येथील कालव्यातील झाडे आणि कचरा काढून टाकावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
शेजारी चासकमान कार्यालय असून दुर्लक्ष
शिक्रापूर येथे ज्या ठिकाणी चासकमान विभागाचे मुख्य कार्यालय आहे, त्याच ठिकाणी काही मीटर अंतरावर असलेल्या चासकमान कालव्यांमध्ये मोठमोठी झाडे झुडपे वाढलेली असून कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, त्यामुळे चासकमान विभागाच्या कार्यालयातील अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.