हिमांशू
उद्याचा दिवस खूपच महत्त्वाचा. बाराव्या महिन्याचा बारावा दिवस. बारा या अंकाइतकंच या दिवसाला महत्त्व आहे. आपल्याकडे गावगाड्यात बलुतेदारही बारा होते आणि आपलं घड्याळही बारा आकड्यांचं. दिवसभर कितीही तात्त्विक गप्पा मारल्या तरी बाराच्या वेळेला पोटाला अन्नच लागतं. भुकेच्या वेळी काहीच मिळालं नाही तर आपण गाड्यावरची डझनभर केळी घेतो… म्हणजे पुन्हा बारा! आपल्या महाराष्ट्रदेशी मोठ्या घडामोडींनंतर नवीन सरकार स्थापन झालं, त्यालाही नुकतेच बारा दिवस उलटले आहेत. तत्पूर्वी मुंबईपासून दिल्लीपर्यंत झालेल्या हालचालींमध्ये बाराताशी घड्याळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
बारामतीची जादू महाराष्ट्रानं पाहिली आणि शिवतीर्थावर पाव डझन पक्षांच्या अर्धा डझन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता हे सरकार बारा महिनेही टिकणार नाही, असं छातीठोकपणे सांगणारेही आहेत. परंतु मुख्य प्रश्न असा की, सरकार स्थापन होण्यास विलंब होत असताना सर्वपक्षीय नेते ज्या गोष्टीकडे बोट दाखवून सत्तास्थापनेसाठी झपाटल्यासारखा प्रयत्न करीत होते, त्या विषयावर बारा दिवसांनंतर कुणीच बोलेना राव! तो विषय म्हणजे शेतीचे वाजलेले बारा! निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच परतीच्या पावसानं महाराष्ट्राला तडाखा दिला. इकडे शेती आणि तिकडे अनेक बडे उमेदवार बाराच्या भावात गेले. शेतकऱ्यांना तातडीनं आधार द्यायला हवा आणि त्यासाठी लवकर सरकार स्थापन व्हायला हवं, असं सर्वपक्षीय नेते म्हणत होते. पण…
नव्या सरकारनं सत्तेवर येताच अनेक धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली. राज्यात कुठे-कुठे सुरू असलेली कामं गुंडाळण्याचे आदेश दिले. वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये ज्यांच्यावर मागच्या सरकारने गुन्हे दाखल केले होते, ते मागं घेतले. परंतु त्याहून कितीतरी महत्त्वाच्या अशा शेतीच्या, शेतकऱ्यांच्या समस्येवर कृती सोडाच; भाष्यही झालं नाही. याच काळात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांचा विषय गाजला. एका कंपनीचं ऑफिससुद्धा फोडलं गेलं.
परंतु गेल्या बारा दिवसांत हा विषयच अचानक गायब झाला. विमा कंपन्यांविषयी कुणी बोलेना. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला किती आणि कशी मदत देणार, हेही कुणी सांगेना. अशातच आता तर बारा तारीख आली! सरकारस्थापनेच्या नवप्रयोगात “मॅन ऑफ द मॅच’ ठरलेल्या बारामतीकरांचा हा वाढदिवस. त्याचप्रमाणं मोठा जनाधार लाभलेल्या गोपीनाथ मुंडे यांची जयंती. यावर्षी बारामतीइतकंच लोकांचं लक्ष गोपीनाथगडाकडे लागलंय. तिथं उद्या “काहीतरी’ घडणार आहे असं म्हणतात! मुक्ताईनगरातले नाथाभाऊही तिकडे जाणार, अशी बातमी आल्यामुळं सस्पेन्स वाढलाय.
थोडक्यात, गेल्या बारा दिवसांत घडलेल्या राजकीय घटनांचा आढावा घेऊन बारा तारखेकडे बघत असताना प्रत्येकाच्या मेंदूत किमान डझनभर तिढे आहेत. कुठे सत्तास्थापनेच्या नाट्याचं जाहीर रसग्रहण सुरू आहे तर कुठे त्या काळात पडलेल्या स्वप्नांसकट सर्व गोष्टींचं अनुभवकथन सुरू आहे. अर्थात, नवं सरकार म्हटल्यावर बाराखडी गिरवण्यात काही दिवस जाणार, हे कबूल आहे. परंतु पावसानं सर्वस्व लुटून नेलेलं पाहणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यातील आसवांना या बाराखडीत कुठेच
स्थान नाही!