मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना बुधवारी येथे होत आहे. दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली असून आजच्या सामन्यातील विजय मालिका जिंकण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी करो या मरो अशीच स्थिती निर्माण झालेली आहे.
कर्णधार विराट कोहलीच्या खेळीने भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवित मालिकेत आघाडी घेतली, मात्र त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या दिशाहिन गोलंदाजी, सुमार क्षेत्ररक्षण व फलंदाजीतील अपयश वेस्ट इंडिजच्या पथ्यावर पडले व त्यांनी विजयासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. अंतिम संघात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या ऋषभ पंतलाच कायम राखणार का संजू सॅमसनला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे.
फलंदाजीत कोहली वगळता अन्य एकाही फलंदाजाला या मालिकेत सरस कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे फलंदाजी मजबूत करावी का एक अतिरीक्त गोलंदाज खेळवावा असा प्रश्न कोहलीसमोर निर्माण झाला आहे. अखेरच्या सामन्यात संघात काय बदल करणार हे जरी कोहलीने स्पष्ट केले नसले तरी किमान दोन खेळाडूंना खेळविण्याचा प्रयोग होऊ शकतो. पंतच्या जागी सॅमसन व यजुर्वेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादव यांना संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मालिका विजयाचा रोहितला विश्वास
ऑस्ट्रेलियामधे होत असलेली विश्वकरंडक टी-20 स्पर्धेचा आत्ताच विचार करण्याची गरज नाही. त्यापूर्वी होत असलेली प्रत्येक मालिका महत्वाची आहे. आगामी काळात काय करायचे त्यापेक्षा प्रत्येक सामन्याचा स्वतंत्र विचार करणे महत्वाचे आहे. सध्या आम्ही फक्त वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेचा विचार करत आहोत, आणि आम्ही मालिका विजय मिळवू असा मला ठाम विश्वास आहे, असे स्पष्ट उत्तर रोहित शर्माने दिले. वेस्ट इंडिजविरुद्धचा टी-20 सामना बुधवारी येथे होत आहे, त्यापूर्व संध्येला सराव सत्रानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने अनेक प्रश्नांवर टोलेबाजी केली.
या मालिकेत भारताची कामगिरी संमिश्र झाली आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी केली. कोहलीने सूत्रे हाती घेत तो सामना संघाला जिंकुन दिला. मात्र दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने फलंदाजी आणि गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करत विजय मिळवला व मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. टी-20 विश्वकरंडकासाठी भारतीय संघ तयारी करत आहे. मात्र त्यापेक्षा सध्या सुरु असलेल्या मालिकेतील विजय महत्वाचा आहे. विश्वकरंडकाचा विचार करण्यासाठी भरपुर कालावधी आहे, त्याचा अत्ताच विचार करण्याची गरज नाही, असेही रोहितने व्यक्त केले.