कार्यक्षेत्रात पन्नासहून अधिक गावे : केवळ एका पोलिसावरच जबाबदारी
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्याच्या पश्चिम भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वाडा ता खेड येथे असलेले पोलीस औट पोस्ट नियमित स्वरूपात सुरु ठेवण्याची मागणी वाडा पश्चिम भागातील नागरिकांनी केली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी इंग्रजांच्या काwadaळापासून वाडा येथे पोलीस औट पोस्ट (मिनी पोलीस स्टेशन) सुरु आहे. या औट पोस्ट अंतर्गत पश्चिम भागातील सुमारे 50पेक्षा जास्त गावे येतात. या पोलीस औट पोस्ट मध्ये नियुक्त असलेले पोलीस याभागात कायदा सुव्यवस्था ठेवतात; मात्र अलीकडच्या काळात येथील औट पोस्टमध्ये एकच पोलीस कार्यरत असतो. शनिवारी वाडा येथील बाजाराच्या दिवशी पोलीस उपलब्ध असतात इतर दिवशी मात्र त्याला कुलूप असते. त्यामुळे कोणताही गुन्हा घडला तर नागरिकांना 40 ते 50 किलोमीटर दूर खेड (राजगुरूनगर) पोलीस ठाण्यात यावे लागते. त्यामुळे अडचणीच्या काळात नागरिकांना मदत मिळत नाही. शिवाय त्यांना आर्थिक भुर्दंड व वेळ वाया जात आहे. तालुक्यातील राजगुरूनगर येथील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे औट पोस्ट येत असल्याने नागरिकांना कायदा सुव्यवस्था पुरविण्यात पोलीस अडचणी येत आहेत.
वाडा येथील पोलीस औट पोस्ट कधीतरीच उघडले जाते. येथे येणाऱ्या नागरिकांना तक्रार देता येत नाही. पोलीस व पोलीस अधिकारी येथे उपलब्ध नसल्याने गैरसोयीचे होते. वाडा परिसरात या पोलीस औट पोस्टअंतर्गत सुमारे 50 गावे येतात. या गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे शिवाय याभागात दोन कॉलेज, आणि 20पर्यंत माध्यमिक शाळा आहेत. प्रत्येक गावागावात वाडी वस्तीमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. डेहणे, वाडा, कुडे या गावात आठवडे बाजार भरतात. त्यामुळे अनेक भांडण चोऱ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे होत आहेत. भोरगिरी-भीमाशंकर हा परिसर पर्यटन आणि भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या परिसरात भाविक व पर्यटकांची मोठी वर्दळ आहे त्यांना सुरक्षा देणे अवघड बाब होत आहे. या परिसर मोबाईल टॉवर रेंज नसल्याने नागरिक पोलीस यांच्यात संवाद होत नाहीत.
चास कमान धरणामुळे पश्चिम भागातील अनेक गावे विस्थापित झाली असल्याने दोन भाग झाले आहेत. त्यामुळे एका भागाला पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क ठेवणे जिकिरीचे आहे. वाडा येथे यापूर्वी या भागातील कोणत्याही गुन्ह्याची तक्रारी नोंदविल्या जात होत्या. त्यावर वाडा पोलीस औट पोस्टमधील अधिकारी तात्काळ दखल घेत कारवाई करीत होते. आता मात्र या पोलीस औट पोस्टमध्ये कर्मचारी नसल्याने कार्यालयाला कुलूप असते. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक याचा फायदा उचलत आहेत.
डेहणे कुडे या गावातील आठवडे बाजारच्या दिवशी पोलीस उपलब्ध होत नाहीत. डेहणे, वाडा, कुडे या परिसरातील नागरिकांना यात्रा उत्सव काळात बंदोबस्त कमी पडतो. या भागातील यात्रा सुरु होणार असून गावागावातील भांडणे उफाळून येतात. त्यावर निंत्रण करण्यासाठी या पोलीस चौकीत संख्याबळ वाढवण्याची मागणी आहे. डेहणे, वाडा येथील महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रोड रोमिओंचा वावर आहे. मात्र पोलीस नसल्याने ते मोकाट आहेत. भीमाशंकर, भोरगिरी परिसरात शहरातील अनेक पर्यटक येतात. विशेषतः तरुणांची मोठी टोळकी असतात. त्यांच्याकडून स्थानिक नागरीक महिला मुली यांची टिंगल टवाळी केली जाते. त्यांच्या शेतात बसून दारूच्या बाटल्या फोडल्या जातात याबाबत बोलणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. येथे एक अधिकारी आणि पाच ते दहा पोलीस कर्मचारी उपलध करून देण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
वाडा औटपोस्टमध्ये रोज एक पोलीस उपलब्ध आहे. येथे दोन पोलीस दैनंदिन कारभार पाहत आहेत; मात्र एक पोलीस बंदोबस्तासाठी व एक प्रशिक्षणासाठी गेल्याने या आठवड्यात औट पोस्टमध्ये पोलीस उपलब्ध झाले नाहीत. पोलिसांची संख्या मुळात कमी असल्याने आणि हा परिसर शांत आहे. असे असले तरी या भागात कायदा सुव्यवस्था पोलिसांकडून ठेवली जात आहे. औट पोस्टमध्ये पोलीस संख्या वाढवली जाईल.
-अरविंद चौधरी, पोलीस निरीक्षक खेड
ग्रामपंचायतींकडून निवेदन
याबाबत त्याभागातील ग्रामपंचायतींनी राजगुरूनगर पोलीस स्टेशनकडे लेखी मागणी केली आहे. वाडा पोलीस औट पोस्ट 24तास सुरु ठेवावे, अशी मागणी होत आहे. या मागणीचे निवेदन खेड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. ते पोलीस हवालदार संतोष मोरे यांनी स्वीकारले. यावेळी जिपचे माजी सदस्य अरुण चांभारे, डेहणेचे सरपंच दत्ता खाडे, माजी उपसभापती सुरेश शिंदे, डेहणेच्या पोलीस पाटील, संगीता भालेराव आदी उपस्थित होते.