धोकादायक वळणे, तीव्र उतारामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपट : अपघातसत्र सुरूच
भिगवण (वार्ताहर) – भिगवण ते बारामती या सुमारे तीस किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मदनवाडी (ता. इंदापूर) घाटामध्ये व लामजेवाडी (ता. इंदापूर) परिसरामध्ये असलेली धोकादायक वळणे व तीव्र उतारामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मागील काही दिवसांमध्ये वाढलेल्या रहदारीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी रस्त्यावरील तीव्र उतार व धोकादायक वळणे काढण्याची आवश्यकता आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती हे एक मोठे व्यावसायिक व शैक्षणिक केंद्र म्हणून मागील काही दिवसांमध्ये उदयास येत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यासह सोलापूर माढा व करमाळा व अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पाथर्डी व जामखेड आदी तालुक्यांतील नागरिकांची वर्दळही बारामती शहराकडे वाढली आहे. बारामती शहराकडे जाण्यासाठी भिगवण ते बारामती रस्ता सोयीचा आहे. यामुळे या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सुमारे तीस किलोमीटर अंतराच्या भिगवण- बारामती रस्त्यावर मदनवाडी व लामजेवाडी या ठिकाणी तीव्र उतार व धोकादायक वळणे आहेत.
चालकांचा वाहनांवरील ताबा सुटला
परिसरातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरून छत्रपती सहकारी साखर कारखाना, बारामती ऍग्रो तसेच माळेगांव साखर कारखान्यांची ऊस वाहतूक करणारी वाहनेही या रस्त्यावरुन ऊस वाहतूक करतात. या रस्त्यावरून भिगवण ते बारामतीच्या शटल बस सेवेच्या 42 फेऱ्या तसेच कोल्हापूर सातारा ते अहमदनगर अशा सुमारे 20 पेक्षा जास्त जलद बस, बारामती औद्योगिक वसाहतीमधील वाहने व दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. तीव्र उतारावर ट्रॅक्टर, बस व जीपवरील चालकांचा ताबा धोकादायक वळणावर सुटल्यामुळे काहींना जीव गमवावा लागला आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले होते.