पुणे – अरबी समुद्रात निर्माण झालेला चक्रवात आणि त्यामुळे राज्यात असणारे ढगाळ वातावरण यामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा रविवारपासून वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे लक्षद्वीप बेटाजवळ निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र. या क्षेत्राचे कालांतराने चक्रीवादळात रूपांतर झाले. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर काही भागात हलक्या पावसाच्या सरी झाल्या. हे “पवन’ चक्रीवादळ आता येमेनच्या दिशेने सरकले आहे, तर दुसऱ्या चक्रावाताची स्थिती ही 710 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे ते निवळण्याची शक्यता आहे. या दोन्ही वादळांचा प्रभाव शनिवारपर्यंत राहणार आहे. त्यानंतर मात्र राज्यात पुन्हा थंडी सुरू होईल, असा अंदाज आहे.