पवनानगर – परतीचा पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे रब्बीचा पेरा रेंगाळला. पवनमावळसह अनेक भागात पेरण्या खोळंबल्या होत्या.पाऊस उशीरा परतल्यामुळे अनेकांची भात कापणी उशिरा झाली. तर दुसरीकडे ज्यांची भातकापणी झाली आहे, पण काहींच्या शेतामधून पाणीच वाहत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची ही कामे खोळंबली होती.
पवनमावळात भात कापणी झाल्यानंतर बरेच शेतकरी पाऊस उघडल्यावर आपल्या शेतात हरभरा, वाटाणा यासारखी कडधान्य पिके घेतात. त्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू, ज्वारी, बाजरी ही पिके घेतली जातात. पण पाऊस उशीरा परतल्यामुळे शेतीची मशागत न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. पण आता मात्र रब्बी हंगामाच्या पेरण्यांना सुरवात झाली आहे. मशागतीच्या कामाला ही वेग आला आहे, काही शेतकरी शेतातमध्ये टोमॅटो, गहू, बाजारी, ज्वारी व अन्य पिकांची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे.