शंकर दुपारगुडे
कांद्याच्या दराने केली शंभरी पार
कोपरगाव – सध्या कांद्याचा भाव प्रति किलो शंभर रुपये झाला आहे. शंभरी पार कांद्याच्या भावाने अनेकांच्या ताटातून कांदा हद्दपार झाला असून कांद्याऐवजी काकडी, कोबीने भाव खालला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातच नाही पिकले तर लोकांच्या ताटात कुठून वाढणार, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या राज्यातला शेतकरी पाण्यावाचून व्याकुळ झाला होता. कमी पाण्यावर कशाबशा पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही. खर्च जास्त उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी राजा अडचणीत आला. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि नको म्हणता म्हणता शेतामध्ये होतं नव्हतं ते सगळे पावसाने उद्ध्वस्त केले. शेतातील उभे पिके पावसाने भुईसपाट झाले. साठविलेले धान्य पाण्याने सडले.
तीन वर्षे दुष्काळाने व्याकुळ झालेला शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पिकावर पावसाने झडप मारली आणि हातातोंडाशी आलेला घास गेला. जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. त्याच्या कष्टावरती आपलं जीवनमान अवलंबून आहे. त्याच्या मातीतल्या उत्पनावर आपण दोन घास खावून जगू शकतो. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली. मोबाइलची गतीमान उत्क्रांती झाली. बड्या उद्योगपतींनी मोबाइलला डाटा मोफत किंवा नाममात्र दरात दिला तरीही माणसांना दररोजच्या जेवणात लागणारा आटा देवू शकत नाही. तो आटा शेतकरीच देवू शकतो.
निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या शेतात यावर्षी कांदा पिकला नाही म्हणून सध्या मार्केटमध्ये कांदा शंभर रुपये किलो दराने विकला जातोय. फक्त कांद्याचा भाव वाढला तर मार्केटमधून कांदा भजी गायब झाली, त्याऐवजी पालक, बटाटा भजीवर समाधान मानावे लागते. मिसळ खाणाऱ्यांना कांद्या ऐवजी कोबी मिळतोय. हॉटेलमध्ये जेवताना तोंडी लावायला कांद्या ऐवजी गाजर, काकडी दिली जाते. गृहिणींनी दररोजच्या भाजीत कांद्याला फाटा दिला आहे.
बुडाला कांदा नसलेली कांद्याची पात विकली जाते. ती सुध्दा पालक, मेथी, शेपुच्या भाजीपेक्षा दुप्पट किंमतीने विकली जाते. काहीनी कांद्याऐवजी कांद्याची पात वापरत आहेत. एकट्या कांद्याने किती जणांचे वांदे केले. गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतात कांद्याचे विक्रमी उत्पन्न झाले होते, पण त्याला योग्य भाव मिळाला नाही म्हणून रस्त्यावर कांदा फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. डोळ्यातून अश्रू ढाळत पिकविलेला कांदा शेतकऱ्यांनी योग्य भाव न मिळाल्याने रस्त्यावर ओतला होता. यावर्षी खांद्याला उच्चांकी भाव आहे.
शंभर रुपये किलो बाजारभाव आहे, पण शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी कांदा शिल्लक नाही. जो काही होता नव्हता. तो कांदा पावसामुळे शेतातून संपला. आणि साठवलेला कांदा पाण्याने सडला.आता याच शेतकऱ्याला शंभर रुपये किलो दराने कांदा विकत घेऊन खाण्याची वेळ आली आहे. शेतामध्ये भाजीपाला पिकाला नाही म्हणून सध्या भाजीपाल्याचा दर गगनाला भिडले. भेंडी, कोबी, फ्लॉवर वांगे अशा अनेक भाज्या 40 रुपये किलोपेक्षा जास्त दराने विकल्या जात आहेत. वाढलेल्या भाजीपाल्याच्या दराने सर्वसामान्य नागरिकांनी भाजीपाल्याकडे पाठ फिरवली आहे. आज भाजी मंडईमध्ये शुकशुकाट आहे. भाजी मंडई ग्राहकाविना ओस पडल्यासारखी दिसते. वाढलेल्या दरामुळे नागरिक भाजीपाल्याकडे पाठ फिरवून कडधान्याकडे वळाले आहेत. मात्र कडधान्याचीही स्थिती कडक आहे. दाळींचे भाव शतकी पार आहेत.
गेल्यावर्षापेक्षा 30 ते 40 टक्के कडधान्यांचे दर वाढले आहेत. पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातून जितके शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याच पटीत आता दर वाढीने सर्वसामान्य नागरिकांचे होत आहे. पालेभाज्या, कडधान्य यांच्या दर वाढल्याने मार्केटमध्ये विविध खाद्य पदार्थ हद्दपार झाले. काही पदार्थ वाजवी दराने विकत घेण्याची वेळ आली आहे. शेतमाल बाजारात योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहोत. येत्या काही दिवसात कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढणार असल्याने शतकी पार झालेला कांदा सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.
राज्यातल्या सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातला कांदा नाहीसा झाला, काही शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये राखून ठेवलेला कांदा आज विक्रीला काढला नेत्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. अशा स्थितीतच कांद्याची आवक नाही वाढली, तर येणाऱ्या काळामध्ये अनेकांच्या डोळ्यांमध्ये कांदा पाणी आणल्याशिवाय सोडणार नाही. शासनाने या महागाईच्या काळामध्ये योग्य नियोजन करणे, अत्यंत गरजेचे आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.