गेल्या आठवड्यात एकाच अजस्त्र कंपनीचं नांव चर्चेत आहे. अजस्त्र हे विशेषण मिरवणारी भारतीय शेअरबाजारातील सर्वांत बलाढ्य कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. दिवंगत धीरूभाई अंबानींनी स्थापन केलेल्या आणि आता मुकेश अंबानींच्या मालकीची असलेल्या कंपनीचं मूल्य गेल्या आठवड्यात 10 लाख कोटी रुपयांच्या (139 बिलियन) टप्प्यावर जाऊन आलं. आकड्यांतंच सांगायचं झालं तर एकावर तेरा शून्य. आज भारतीय शेअरबाजारातील कोणतीही कंपनी या कंपनीच्या जवळपास देखील नाहीये.
मार्केट कॅपिटलायझेशननुसार अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो टीसीएस (7.70 लाख कोटी रु.) व एचडीएफसी बॅंक (6.97 लाख कोटी रु.) या कंपन्यांचा. ऑगस्ट 2005 ते आतापर्यंत कंपनीच्या मूल्यात दहापट वाढ झालेली आहे तर कंपनीच्या शेअरच्या भावात 12 पट. दुसरीकडं जपानची सोनी कॉर्पोरेशन ही कंपनी रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या अखत्यारीतील नेटवर्क 18 विकत घेण्याच्या मार्गावर आहे, त्याचबरोबरीनं या समूहातील न्यूज चॅनेल्ससाठी टाईम्स ग्रुप बोली लावणार अशी चर्चा आहे.
अर्थातच त्यामुळं अंबानींचं नांव जगभरात झळकलं नसतं तरच नवल. गेल्याच महिन्याच्या शेवटास मुकेश अंबानी हे जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये नवव्या स्थानावर विराजमान झालेले आहेत. 3 मे 2019 रोजी या वर्षातील सर्वोच्च भाव (1417.50) नोंदवल्यानंतर कंपनीनं पुढील सहा महिन्यांत 10 टक्के वाढ नोंदवलेली दिसते.
कंपनीनं आपल्या वार्षिक सर्वसाधारणसभेत कंपनीवरील कर्जाचा बोजा नाहीसा करणार असल्याचं सूतोवाच केलं होतं आणि त्या दृष्टीनं सौदी आरामकोस हिस्सा विक्री व चालवण्यास क्लिष्ट अशा नेटवर्क 18 मधील विक्री या बाबी त्या दृष्टीनं सकारात्मक पुरावा देतात. बाजारातील पडझडीत रु. 1500 ते 1420 दरम्यान हा शेअर पुन्हा मिळाल्यास आपल्या पोर्टफोलिओस चार चांद लावणारा ठरू शकतो.