नगर – देशासह राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्याच धर्तीवर जिल्हा, तालुका, गावे तसेच शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबविल्या जात आहे. मात्र, त्याला दक्षिणेचे खासदार सुजय विखे हे अपवाद ठरले आहे.
शहर विद्रुपीकरणाला त्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत आहे. शहरातील चौका-चौकात त्यांच्या वाढदिवसाचे फलक लागले असल्याचे दिसत आहे. मात्र हे फलक अनधिकृत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. शहरात अधिच स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यात आणखी भर जो तो आपल्या मोठ-मोठे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. नगर दक्षिण जिल्ह्याच्या विकासासाठी लोकसभा निवडणुकीत विखेंना मोठ्या मताधिक्याने विजय केले.
त्यात नगर शहराचा मोठा वाटा आहे. अर्थात गेल्या सहा महिन्यात विखेंनी नगर शहराच्या विकासासाठी अवघ्या तीन बैठका घेतल्या आहेत. त्यात प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. उड्डाण पुलाबाबत घेतलेल्या पहिल्या बैठकीत त्यांनी महिन्याभरात उड्डाणपुलाचे काम सुरू करणार असल्याचे आश्वास दिले होते. पण ही बैठक होवून आज चार महिने झाले तरी अद्यापही उड्डाणपूल नगरकरांना दिसलाच नाही. शहर विकासासाठी खा. विखेंकडून अद्यापही कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. असे असतांनाही त्यांच्या समर्थकांकडून शहरात कोणाची परवानगी न घेताच सर्रास शुभेच्छाचे फलक लावण्यात आले असल्याबद्दल नगरकारांनी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
फलकांवर कारवाई करणार
महापालिकेकडून शहरात लावण्यात येणाऱ्या फलकांना परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी फलक लावले आहेत. त्यांच्यावर शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्याचे आर्थिक चक्र फिरेनासे झाले. रब्बीच्या पिकांसाठी बि-बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, खासदार सुजय विखेंच्या वाढदिवसाचे फलक मात्र शहरभर चौका-चौकात लावण्यात आले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जनतेने निवडून दिलेल्या खासदारांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले असल्याचे बोलले जात आहे.