विखे गटाकडून दावा होण्याची शक्यता : बेरड, प्रा. शिंदे यांच्यापैकी लागणार एकाची वर्णी
नगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत भाजपची मोठी पडझड होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे वर्चस्व वाढले असले, तरी जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या तरी विद्यमान जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या मागे जिल्ह्यातील संघटना उभी असल्याने त्यांचीच पुन्हा जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. परंतु माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाकडून या पदासाठी दावा झाल्यास भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून तोडगा म्हणून माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपने संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, नगर ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षपदाची 10 डिसेंबरपूर्वी निवड करण्यात येणार आहे. पक्षाने संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात सक्रिय सदस्य नोंदणी 10 ते 20 नोव्हेंबरपर्यंत होणार असून, 24 नोव्हेंबरला सक्रिय सदस्य पडताळणी होईल. 15 ते 25 नोव्हेंबरदरम्यान बूथ अध्यक्ष आणि बूथ समिती सदस्यांची निवड होईल. त्यानंतर 25 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान मंडल अध्यक्ष आणि मंडल समिती सदस्यांची निवड होईल. त्यानंतर 1 ते 10 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीची निवड होईल. त्या दरम्यान जिल्ह्यातून प्रदेश परिषद सदस्य निवड होणार आहे. त्यानंतर 15 डिसेंबरला प्रदेशाध्यक्षपदाची निवड होणार आहे.
भाजप संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला बारा पैकी केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने संघटनात्मक निवडणूक महत्त्वाची ठरली आहे. मध्यंतरी जिल्हा निरीक्षक खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेबाबत बैठक झाली. या बैठकीत राधाकृष्ण विखे यांनी बूथ समितीवर विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर फोडले आहे. बूथस्तरावरील अध्यक्ष व सदस्यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे पक्षाला पराभवाला समोरे जावे लागले, असा थेट आरोप विखे यांनी केला. त्यामुळे विखे पक्ष संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेत सक्षमपणे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात विखेंनी बूथ समितीवर ठपका ठेवला असला, तरी त्यातून जिल्हाध्यक्षासह तालुकापातळीवरील पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखविले आहे. संघटना आणखी बळकट करण्याचे विखेंनी सुचविले असल्याने ते या प्रक्रियेत सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपचे बूथस्तरापासून संघटना बांधणीचे काम लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून सुरू केले आहे. असे असतानाही विधानसभा निवडणुकीत आठ जागांपैकी केवळ तीन जागा जिल्ह्यात मिळाल्या. ज्या जागांवर उमेदवार विजयी होण्याची शक्यता असतानाही त्याला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संघटना बांधणी करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी “मास लिडर’ चेहरा पाहिला जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गटतट फारसे नसले, तरी विधानसभा निवडणुकीनंतर मात्र विखे हे एकटे पडले आहे. भाजपचे पराभूत व विद्यमान आमदार विखेंच्या विरोधात आहेत. सहाजिकच त्यांचे पडसाद संघटनात्मक निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
पराभूत आमदारांसह निवडून आलेल्या आमदारांनी लेखी स्वरूपात विखेंच्या कारस्थानाचे पुरावे पक्षश्रेष्ठींना दिले आहे. विखेंमुळेच आमचा पराभव, तर मताधिक्य घटल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गंत निवडणुकीत विखे सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या तरी भाजपचे मुळे पदाधिकारी व नेते एकाबाजूला तर विखे दुसऱ्या बाजूला अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडीत चुरस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या तरी विखे वगळता अन्य सर्व तालुक्यतील नेते व पदाधिकाऱ्यांकडून बेरड यांच्या नावाची सूचना होण्याची शक्यता आहे.
पण विखेंनी या प्रक्रियात सक्रिये झाले तर मात्र जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. संघटनात्मक बांधणीसाठी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा जाण्याची शक्यता आहे. पण विखे विरूद्ध संपूर्ण जिल्हा अशी स्थिती निर्माण झाली, तर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. प्रा. शिंदे यांनी प्रभावीपणे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. जिल्ह्यातील गट तट त्यांनी संपुष्टात आले होते.
शहर जिल्हाध्यक्षपदासाठी गांधी, आगरकर यांच्या लढत
शहर भाजपमध्ये माजी खासदार व विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी व ऍड. अभय आगरकर गटातील वाद जुनाच आहे. महापालिका व नंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गांधी यांचे नेतृत्व प्रभावी ठरले नाही. त्यामुळे गांधी यांच्या कार्यपद्धतीवर शहरात मोठी नाराजी आहे. त्याचा फायदा आगरकर यांना होण्याची शक्यता आहे. शहरात मध्य शहर, सावेडी, केडगाव व भिंगार हे चार मंडल अध्यक्ष आहेत. मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीवरून दीडवर्षापूर्वी गांधी व आगरकर गटात मोठे वादंग झाले होते. मंडल अध्यक्षपदाचा वाद प्रदेशपर्यंत पोहाचला होता. शहर जिल्हाध्यक्षपदावरून गांधी व आगरकर गटात रस्सीखेच होणार असून मंडल अध्यक्षपदावर आपल्या समर्थकांची नियुक्ती करण्यासाठी या दोन्ही गटाचा प्रयत्न राहणार आहे.