राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार घरवापसीसाठी आग्रही
मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारचे योग फळफळल्यावर राष्ट्रावादी कॉंगेस सोडून निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात गेलेल्या अनेक दिग्गजांना नेत्यांना घरवापसीचे वेध लागले आहेत. सत्तेत बसण्याचे वाजले की बारा मला येऊ द्या घरी म्हणत हे नेते ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी धडपड करत आहेत. या नेत्यांना थोपवत पक्ष एकसंध ठेवण्यासाठी भाजपा नेते सत्तास्थापनेचे गाजर दाखवत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अकल्पनीय लागले. भरतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हातमिळवणी करत कॉंग्रेसच्या बाहेरून पाठींब्यावर सत्तेचा सोपान चढण्याची तयारी केली. त्यानंतर सत्तेचा मेवा चाखण्यासाठी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या नेत्यांची पंचाईत झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा 10 आमदारांनी पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधून पुन्हा पक्षात घ्या अशी गळ घालण्यास सुरवात केली आहे. त्यात काही दिग्गजांचाही समावेश असल्याचे खात्रीशीर सुत्रांनी सांगितले.
मध्यंतरी, अजित पवार यांनीही सहा आमदात राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी माझ्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. जर हे नेते पक्षांतर करून राष्ट्रवादीत परत आले, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सरकार स्थापनेला बळ मिळणार आहे. एवढेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाची अजिंक्य या निर्माण झालेल्या प्रतिमेला तडे जाणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडणाऱ्यांमध्ये गणेश नाईक, सचिन आहिर, जयदत्त क्षिरसागर, राणा जगजितसिंह यांचा समावेश होता.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाला अपक्ष मिळून 119 आमदारांचा पाठींबा असल्याने पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले. त्यावर शिवसेनेचे मुखपत्र असणअऱ्या सामनातून टीकेची झोड उठवण्यात आली. 105 आमदार असूनही बहुमत नसल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले होते. त्यामुळे ते आता सत्तास्थापनेचा दावा कसा करू शकतात?असा सवाला त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीचे सरकार सहा महिन्यापेक्षा अधिक काळ टिकणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचाही समाचार घेत या नव्या राजकीय समिकरणाने अनेकांची पोटदुखी सुरू झाल्याचा टोला लगावला.