प्रा. शुभांगी कुलकर्णी
तेजस एक्स्प्रेसमधील केबिन होस्टेसबरोबर प्रवाशांकडून होत असलेले गैरवर्तन हे सडलेल्या मानसिकतेचे प्रतीक मानावे लागेल. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली आहे की, ना कुणाच्या खासगीपणाची फिकीर आहे ना कुणाशी शालीनतेने वागण्याचे भान आहे.
कोणत्याही समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत सामाजिक वातावरण बदलू शकत नाही. तांत्रिक सुधारणा किंवा उच्च प्रतीच्या सुविधा यामुळे जीवनाचा स्तर उंचावू शकतो; परंतु माणसाचा आचार-विचार आणि व्यवहार त्यामुळे बदलेलच असे नाही. तेजस एक्स्प्रेसमधील केबिन होस्टेसबरोबर प्रवाशांनी केलेले गैरवर्तन हे याच सडक्या मानसिकतेचे उदाहरण होय. लखनौ-दिल्ली-लखनौ या मार्गावर काही दिवसांपूर्वीच तेजस एक्स्प्रेसची सेवा सुरू करण्यात आली. ही रेल्वेगाडी सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे; परंतु या गाडीत केबिन होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या महिला मात्र हैराण झाल्या आहेत.
काही प्रवाशांकडून त्यांच्याशी होत असलेले गैरवर्तन हे त्याचे प्रमुख कारण आहे. गाडीतून प्रवास करणारे काही विक्षिप्त प्रवासी या होस्टेस महिलांचे फोटो काढतात. व्हिडीओ तयार करतात. एवढेच नव्हे, तर काही प्रवासी त्यांच्यासोबत सेल्फीही काढतात. काही प्रवासी कारण नसताना बटण दाबून होस्टेसला बोलावून घेतात. काही प्रवासी तर या महिलांची छेडही काढतात. अशा असभ्य वर्तनामुळे या महिलांना काम करणे अवघड होऊन बसले आहे. हे असभ्य वर्तन महिलांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. वास्तविक, अशा स्वरूपाच्या वर्तनाचा थेट संबंध प्रवाशांच्या मानसिकतेशी आहे. ही मानसिकता बाळगणाऱ्या लोकांना ना श्रमाची प्रतिष्ठा समजते ना महिलांच्या प्रतिष्ठेची किंमत कळते. त्यामुळेच सुखसुविधांनी युक्त असलेल्या या रेल्वेगाडीतून आरामात प्रवास करण्याऐवजी या महिलांशी लगट करण्याच्या हेतूनेच अनेकजण प्रवास करतात.
तेजस एक्स्प्रेस ही अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण, आरामदायी प्रवासासाठी सुरू केलेली गाडी आहे. गाडीला उशीर झाल्यास सरकारकडून प्रवाशांना नुकसानभरपाई दिली जाते, अशी ही पहिलीच गाडी आहे. आरामदायक आसनांव्यतिरिक्त विमानात ज्या सुविधा दिल्या जातात, त्या दर्जाच्या सुविधा प्रवाशांना या रेल्वेगाडीत मिळतात. प्रत्येक आसनाच्या वरील बाजूला रीडिंग लाइट आणि अटेंडंट कॉल बटण देण्यात आले आहे. हे बटण दाबताच बोगीमध्ये सेवेस असलेली ट्रेन होस्टेस प्रवाशांच्या सेवेसाठी हजर होते. काही अडचण असल्यास मदत करते. क्रू मॅनेजमेंट मेंबर या नात्याने प्रवाशांच्या सुविधांची काळजी घेणे ही या होस्टेस महिलांची जबाबदारी आहे.
प्रवाशांना सुविधा देण्याचे काम करणाऱ्या मुलींच्या दृष्टीने प्रवाशांची अशी वर्तणूक त्यांची असुरक्षितता आणि तणाव वाढविणारी ठरली आहे. त्यामुळेच अखेरीस रेल्वे होस्टेस महिलांशी सभ्यतेने वर्तन करण्यासंदर्भात रेल्वेची सहायक शाखा, रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ यांच्यावर प्रवाशांसाठी सूचना (ऍडव्हायजरी) प्रसिद्ध करण्याची वेळ आली आहे. या मार्गदर्शक प्रणालीनुसार, तेजस एक्स्प्रेसमधील उद्घोषणा पद्धती बदलण्याचा निर्णय आयआरसीटीसीला घ्यावा लागला आहे.
आता रेल्वेगाडीत प्रवासादरम्यान रेल्वे होस्टेसबरोबर सभ्य व्यवहार करण्यासंदर्भात चक्क उद्घोषणा करण्यात येणार आहे. तसेच आयआरसीटीसीचे अधिकारी प्रवाशांसंदर्भात होस्टेस महिलांकडून प्रतिक्रियाही नोंदवून घेणार आहेत. एवढेच नव्हे, तर होस्टेसच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात येत आहेत. भारतातील पहिल्या कॉर्पोरेट रेल्वेगाडीची मालकी भारतीय रेल्वेकडेच आहे, हे विशेष. या गाडीची तिकीटविक्री करणे तसेच केटरिंग यासाठी ही गाडी आयआरसीटीसीला भाड्याने देण्यात आली आहे. त्यामुळेच या गाडीत काम करणाऱ्या महिलांना सुरक्षितता आणि सन्मानजनक वागणूक मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आयआरसीटीसीसाठी आवश्यक बनले आहे.
ज्या रेल्वेगाडीच्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत, त्याच प्रवाशांना सभ्य वर्तनाचे साधे नियम कळू नयेत, ही शोकांतिका आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या शोषणाचीच ही घटना आहे. आपल्याला स्मार्ट सुविधा हव्या आहेत, परंतु आपण सभ्य नागरिक मात्र बनायला तयार नाही. तेजस एक्स्प्रेस सुरू केल्यापासूनच रेल्वे होस्टेसबरोबर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. लोक कोणत्याही चांगल्या सुविधेचे मूल्य जाणत नाहीत आणि कुणाच्या श्रमाचे मूल्यही जाणत नाहीत, हेच प्रवाशांच्या या वर्तनातून स्पष्ट होते. कोणत्याही क्षेत्रात इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आपले काम करणाऱ्या महिलांच्या खासगीपणाचा भंग करण्याचीच ही मानसिकता आहे. कार्यस्थळी होणाऱ्या शोषणाचेच हे उदाहरण आहे. स्मार्ट सुविधांची अपेक्षा करणारे लोक आपले वर्तन त्यानुरूप कधी करणार, हाच प्रश्न आहे. चांगल्या सुविधांचा अनुभव घेत सभ्यपणे प्रवास करण्याची मानसिकता कधी तयार होणार, या प्रतीक्षेत रेल्वे होस्टेस आहेत.
भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात महिलांसाठी अशा प्रकारे कार्यक्षेत्रांचा विस्तार होणे सुखद आहे. रोजगाराच्या या नव्या संधीचे महिलांच्या दृष्टीने मोठे महत्त्वही आहे; परंतु कामाच्या पातळीवर अशा प्रकारे अवहेलनेला सामोरे जावे लागण्याचा अनुभव महिलांना सर्वच क्षेत्रांत येतो. सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना या संकटाचा सामना खूपच अधिक प्रमाणात करावा लागतो. कारण अशा ठिकाणी त्या पुरुषांच्या विचित्र मानसिकतेला लवकर बळी पडतात. स्मार्ट शहरे, डिजिटल जीवनशैली अशा आपल्या आजच्या अपेक्षा आहेत.
मात्र, त्या जीवनशैलीला अनुसरून आपली मानसिकता का बदलत नाही, हा मूळ प्रश्न आहे. जीवन प्रगतीशील होत असताना विचार प्रगतीशील कधी होणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. लिंगभेदाबरोबरच एखादे काम श्रेष्ठ आणि एखादे काम कनिष्ठ मानण्याचीही आपल्याकडे मानसिकता आहे. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांशी गैरवर्तन करण्याची मानसिकताही संपत नाही. वस्तुतः समाजात किती आणि कसा बदल होत आहे, याचे उत्तर डिजिटल जीवनशैलीतून किंवा स्मार्ट शहरांमधून मिळत नाही, तर लोकांच्या व्यवहारांतून मिळत असते. विचारांमध्ये, मानसिकतेमध्ये बदल झाल्याखेरीज व्यावहारिक पातळीवर काहीही बदलू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.