विठ्ठल वळसे पाटील
रस्ते अपघात हा दैनंदिन जीवनाचा भाग झालेला दिसतो. या भीषण समस्येवर अजूनही मार्ग काढण्यात आलेला नाही त्यामुळे “रस्ते अपघात’ एक न सुटलेला यक्षप्रश्न ठरतो.
सध्या आपल्या देशात लोकांचे आर्थिक जीवनमान उंचावत असल्याने चलनवलन मोठ्या प्रमाणात होत असल्याने व अल्प दरात कर्जपुरवठा होत असल्याने सर्व सामान्य माणूसही चैनीच्या वस्तू खरेदी करू लागला आहे. या खरेदीत पालकांपेक्षा मुलांना मोठी हौस असते. यात वाहन खरेदी करण्यात जास्त कल असतो. एकदा वाहन दारात आले की ते चालवण्याची हौस भागवली जाते. मात्र, पालक अल्पवयीन मुलामुलींना वाहन चालवण्यास देतात. त्यात देशातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्डयांत रस्ते अशी परिस्थिती आहे. त्यात रस्त्यांच्या नादुरुस्ती व मानवी चुकांमुळे जीव गमवावा लागत आहे. वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या व वेग नियंत्रण उल्लंघन, वाहतूक नियम मोडणे असे प्रमाण वाढत असून यात अल्पवयीन मुलांचा अधिक समावेश आहे. देशात अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी नियंत्रण आणि नियमन यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती असलेल्या मार्गाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लवकरच सुरू होत आहे. मुंबई-पुणे ही दोन्ही प्रमुख औद्योगिक शहरे असल्याने या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये जा करत असतात. या मार्गावर 10 वर्षांच्या काळात अनेक जणांनी जीव गमावला आहे. या रस्त्याने प्रवास सुखकर व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. यात द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूच्या लेनवर कॅमेरे नजर ठेवणार आहेत. तर काही कॅमेरे हे वाहनांची ओळख पटविण्यास असणार आहे. यातून वाहतूक नियमभंग केल्याचेही दिसणार आहे. वाहनांच्या नियंत्रणावर मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन गस्त करणार आहे. वाहनांना संदेश देणारे फलक, पाऊस, धुके, वाऱ्याचा वेग यांचा संदेश डिजिटल फलकावर मिळणार अशा आधुनिक सोयी उपलब्ध करण्यात येणार आहे.
अशा अद्ययावत पद्धतीने काही मार्गांचे रूप पालटत असताना मात्र, ग्रामीण व इतर शहरी रस्ते सुरक्षेबाबत खूपच मागे आहेत. अशा रस्त्यांवर कायम वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळतो. या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. तसेच ठिकठिकाणी तुटलेले दुभाजक, जाहिरातींचे फलक अशा अनेक कारणांनी अपघात प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. ग्रामीण व शहरी रस्त्यांवर शाळा, कॉलेजमधील मुले, मुली दुचाकी, चारचाकी गाडी भरधाव वेगाने चालवतानाचे चित्र सर्रासपणे दिसते. गाडी चालवण्याचा परवाना नसलेला वर्ग आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यातही ही मुले गाडीची सायलेन्सरची पुंगळी काढून मोठा आवाज करत फिरत असतात.
तसेच बुलेट बार, गाडीच्या रचनेत बदल करणे, कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न लावून तरुणाई रंग उधळताना दिसत आहे. तरुणांना आवर न घातला गेल्याने तरुणाईने आपले जीवन रस्त्यावर पणाला लावले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात, रेल्वेत स्टंट करताना आपला जीव गमवणारे अनेक तरुण आहेत. बुडून मृत्यू, नैसर्गिक अपघात, सर्पदंश, रस्ते अपघात आदी अपघातात राज्यात शालेय जीवनातील 1 हजार 190 विद्यार्थ्यांनी 2018-19 मध्ये प्राण गमावला आहे. ही आकडेवारी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना अंतर्गत संख्या आहे. शिष्टाचार आणि शिस्त या दोन्ही गोष्टींना तरुण तिलांजली देत आहे. बेभान तरुणाईला आवरणे फार अवघड झाले आहे.
2018 मध्ये राज्यातील रस्ते अपघातांत 13 हजार 59 लोकांनी जीव गमावला आहे. तर 2017 सालात 12 हजार 511 जणांचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध आकडेवारीच्या सरासरी नुसार दर तासाला 55 अपघात होतात तर दररोज 17 जणांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे रस्ते जीवनसुरक्षा हमी देणारे नाहीत असेच चित्र नजरे समोर उभे राहते. यातील 80 टक्के मृत्यू हे मानवी चुकांमुळे झाले आहेत. यात नशा, झोप, वेगाने गाडी चालवणे, ओव्हर लोड, सुरक्षा साधनांचा अभाव आदी मुळे अपघात झाले आहे. मात्र नादुरुस्त रस्ते, अपघाती वळणे, रस्त्यावर मार्गस्थ होण्यास सुरक्षा चिन्ह नसणे, दरड कोसळणे, पूल तुटणे आदी प्रकारही मारक ठरले आहेत.
पण यात बेशिस्तपणे गाडी चालवणे, एकमेकांना ओव्हरटेक करणे, रस्त्यावर रेस लावणे आदी प्रकार अधिक कारणीभूत आहेत. तरुणाईला शिस्त लावण्यास पोलीस प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे मत ज्येष्ठ मंडळी बोलून दाखवतात. रस्त्यावरील चौक सोडला तर इतर ठिकाणी वेगावर नियंत्रण आणणे अवघड आहे. राज्यातील रस्त्यावरील धोकादायक वळणे, अरुंद रस्ते अशी अपघातप्रवणक्षेत्रे 1, हजार 324 नोंदविण्यात आली आहेत मात्र, सार्वजनिक बांधकाम क्षेत्र कामात दिरंगाई करत असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.
मागील वीस वर्षांचा काळ पाहिला तर 90 टक्के तरुणांकडे सायकल शिवाय पर्याय नव्हता. आता मात्र प्रत्येक घरात दुचाकी आली आहे. त्यामुळे सायकल प्रवास नाहीसा झाला आहे. वजनांनी हलकी व सहज चालवता येणारी दुचाकी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी आज शाळा कॉलेजात दुचाकीबरोबर चारचाकीवरून फिरताना दिसत आहे. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर गाडी चालवण्याचा परवाना मिळत असला तरी मुलांच्या हट्टापायी गाडी दिली जाते. या मुलांकडून भर रस्त्यावरून सामूहिकपणे गाड्या चालवणे, रात्रीअपरात्री मित्रांचे वाढदिवस साजरे करण्यास जाणे, स्टंट करणे, सुरक्षा साधनांचा वापर न करणे यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातास पालक जबाबदार आहेत त्यास दंड व शिक्षेचीही तरतूद आहे. राष्ट्र प्रबळ करावयाचे असेल तर तरुणांच्या व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयात वाहतुकीचे नियम व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणे आवश्यक आहे.